ST कर्मचाऱ्यांचे वेतन वाढीचे थकीत हप्ते देण्यासाठी शासन कटिबद्ध; १०० कोटी रुपये तातडीने अदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 22:45 IST2026-02-20T22:44:14+5:302026-02-20T22:45:46+5:30
ST Bus News: दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू असल्यामुळे प्रवासात कोणते अडथळा निर्माण होऊ नये यासाठी काही संघटनांनी पुकारलेले आंदोलन तातडीने स्थगित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ST कर्मचाऱ्यांचे वेतन वाढीचे थकीत हप्ते देण्यासाठी शासन कटिबद्ध; १०० कोटी रुपये तातडीने अदा
ST Bus News: एसटीच्या सुमारे ८६ हजार कर्मचाऱ्यांचे वेतन वाढीचे थकीत हप्ते देण्यासाठी शासनाने तातडीने १०० कोटी रुपयांची तरतूद केली असून लवकरच फेब्रुवारी महिन्याच्या वेतनात सोबत देण्यात येणारा वेतन वाढीचा थकीत हप्ता कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. तसेच या अनुषंगाने येत्या २४ फेब्रुवारीला काही कामगार संघटनांनी पुकारलेल्या आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
मंत्री सरनाईक म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांना वेतन वाढीच्या थकीत हप्ता देण्यासाठी एसटी महामंडळाकडे पैसे नसल्यामुळे शासनाने ती जबाबदारी उचलावी. अशी चर्चा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार व सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी केली होती. त्यानुसार त्यांच्या अनुमतीने दरमहा सुमारे ६५ कोटी रुपये शासनाने अनुदान स्वरूपात एसटीला द्यावेत असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामगार संघटनांच्या सोबत घेतलेल्या बैठकीमध्ये दिले होते.
सदर थकीत हप्ते डिसेंबर महिन्याच्या वेतनात सोबत देण्यास सुरुवात झाली. तथापि काही तांत्रिक अडचणींमुळे फेब्रुवारी महिन्याच्या वेतनासोबत सदर हफ्ता देण्यासाठी एसटी महामंडळाकडे निधी उपलब्ध नव्हता. त्यामुळे थकीत हप्ता न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याची भावना एसटी कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण होऊन त्यांच्यात नाराजी पसरली. अशा परिस्थितीत काही कामगार संघटनांनी आंदोलनाच्या पवित्रा घेतला होता. सदर गंभीर परिस्थिती ओळखून परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांचीशी चर्चा करून या थकीत हप्त्यापोटी २१० कोटी रुपये तातडीने सरकारने एसटीला द्यावेत अशी विनंती केली. त्याचा सातत्याने पाठपुरावा देखील केला.
दरम्यान, या २१० कोटी रुपयांपैकी १०० कोटी रुपये आज शासनाने दिले असून उर्वरित निधी देखील लवकरच प्राप्त होईल त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाचे हप्ते कोणते परिस्थितीमध्ये देण्यात येतील असे ठाम आश्वासन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शासनाच्या वतीने दिले आहे. तसेच सध्या दहावी व बारावीच्या मुलांच्या परीक्षा सुरू असल्यामुळे त्यांच्या प्रवासात कोणते अडथळा निर्माण होऊ नये यासाठी काही संघटनांनी पुकारलेले आंदोलन तातडीने स्थगित करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.