अकरावी प्रवेशात तांत्रिक विघ्नेच फार; मुंबईत २००, तर राज्यात १३ हजार तक्रारी दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 08:57 IST2025-06-01T08:56:27+5:302025-06-01T08:57:42+5:30
या सर्व तक्रारी १०० टक्के सोडवल्या जातील, असे शिक्षण विभागाचे सहसंचालक श्रीराम पानझडे यांनी सांगितले.

अकरावी प्रवेशात तांत्रिक विघ्नेच फार; मुंबईत २००, तर राज्यात १३ हजार तक्रारी दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: इयत्ता अकरावीच्या कॉलेज प्रवेशासाठी सरकारने प्रत्येक विभागामध्ये विद्यार्थ्यांसाठी मदत कक्ष सुरू केले आहेत. मात्र, या कक्षांना मर्यादित अधिकार असल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्यांचे पुणे कार्यालयाकडून निराकरण होईपर्यंत वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप होत आहे. दरम्यान, आतापर्यंत मुंबईत २००, तर राज्यभरात १३ हजार तक्रारी शिक्षण विभागाकडे आल्या आहेत. या सर्व तक्रारी १०० टक्के सोडवल्या जातील, असे शिक्षण विभागाचे सहसंचालक श्रीराम पानझडे यांनी सांगितले.
अकरावी प्रवेश प्रक्रियेत शनिवारी सायंकाळपर्यंत नऊ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी राज्यभरात नोंदणी केली. सुरुवातीचे एक-दोन दिवस ठीक गेले. नंतर मात्र संकेतस्थळ हँग होण्याचे प्रकार वारंवार घडू लागले. तसेच २७ व २८ मे या दोन दिवसांत विद्यार्थ्यांनी शुल्क भरल्यानंतर त्यांना त्याबाबतचा संदेश येईनासा झाला. लॉगिन आयडी, पासवर्ड विसरणे, डमी विद्यार्थ्याने अर्ज करणे किंवा अर्ज भरतानाच डबल स्पेस दिली जाणे, अशा तांत्रिक कारणामुळे विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यात अडथळे निर्माण झाले.
‘रिपीटर’कडून फ्रेश म्हणून अर्ज
मुंबईमध्ये २६ मेपासून पाच दिवसांत २०० तक्रारी प्राप्त झाल्या. यापैकी ९० टक्के तक्रारींचा निपटारा झाला आहे. मात्र काही रिपीटर विद्यार्थ्यांनी फ्रेश विद्यार्थी म्हणून अर्ज भरला, अशावेळी मदत कक्षांकडे पूर्ण अधिकार नसल्यामुळे तक्रार पुण्याला पाठविण्याशिवाय पर्याय नसतो, असे नाव न सांगण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने सांगितले.
विभागातील प्रत्येक मदत कक्षांना त्यांच्या कामाची व्याप्ती वाढवून दिली आहे. काही प्रमाणात त्यांना अधिकार बहाल केले आहेत. राज्यात शुक्रवारी एकाच दिवशी ६०० तक्रारी प्राप्त झाल्या. त्या सर्व सोडवल्या आहेत.
-श्रीराम पानझडे, सहशिक्षण संचालक, माध्यमिक शिक्षण विभाग