संगमनेर : राज्यभरात ग्रामपंचायतींच्या निकालातून भाजपची पीछेहाट झाल्याचे समोर आले आहे. हे भाजपच्या धोरणाचे अपयश असून, त्यांच्या पक्षाच्या अनेक नेत्यांना आपले गावही राखता आलेले नाही. भाजप नेत्यांनी नेहमीच्या सवयीप्रमाणे खोटी आकडेवारी जाहीर केली. त्यांनी केलेला दावा खोटा आहे. त्यांनी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी खुल्या दिलाने पराभव स्वीकारावा, अशी टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.थोरात म्हणाले, महाविकास आघाडी सरकारवर जनतेचा मोठा विश्वास आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाने यावर शिक्कामोर्तब झाले आहे. कोल्हापूर, नंदूरबार, लातूर, नांदेड, अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, उस्मानाबाद, वाशीम, बुलडाणा या जिल्ह्यात आतापर्यंतच्या निकालावरून काँग्रेस क्रमांक एकचा पक्ष म्हणून समोर आला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीप्रमाणेच जनतेने या निवडणुकीतही भाजपचा दारुण पराभव करत, महाराष्ट्र विकास आघाडीला कौल दिला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाच्या उमेदवारांवर विश्वास दाखविला आहे. विदर्भात काँग्रेस पक्षाला मोठे यश मिळाले असून, ५० टक्क्याहून अधिक ग्रामपंचायतीत काँग्रेसचा विजय झाला आहे. विदर्भातील जनतेने काँग्रेसच्या पारड्यात निर्विवाद यश टाकले आहे. मराठवाड्यात काँग्रेसच्या जागा आणि मतांचाही टक्का वाढला.
अनेक भाजप नेत्यांनी गावही गमावले, खुल्या दिलाने पराभव स्वीकारावा - बाळासाहेब थोरात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2021 04:35 IST