“मराठा आरक्षण मिळाले तरी मुंबई गाठणार, नाही मिळाले तरी जाणार”; मनोज जरांगेंचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 15:09 IST2024-01-18T15:03:22+5:302024-01-18T15:09:49+5:30
Manoj Jarange Patil Maratha Reservation News: सरकारचे नेमके काय सुरू आहे, ते माहिती नाही, असे सांगत मनोज जरांगे यांनी मुंबईला येण्याबाबत स्पष्ट भाष्य केले.

“मराठा आरक्षण मिळाले तरी मुंबई गाठणार, नाही मिळाले तरी जाणार”; मनोज जरांगेंचा निर्धार
Manoj Jarange Patil Maratha Reservation News: एकीकडे देशभरात श्रीरामोत्सवाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, दुसरीकडे महाराष्ट्रात अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम असलेले मनोज जरांगे पाटील २० जानेवारी रोजी मुंबईकडे निघणार आहेत. मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होण्याचे आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केले आहे. यातच आता काही झाले तरी मुंबईत जाणारच असा पवित्रा मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे.
सरकारचे नेमके काय सुरू आहे, ते माहिती नाही. आम्ही त्यांना काही ओळी टाकण्यास सांगितले होते. मात्र, मला वाटत नाही की, त्या ओळींचा समावेश सरकारने केला असेल. सरकारने जी काही दुरुस्ती केली आहे, ती व्हॉट्सअॅपवर पाठवली. अशा गोष्टी व्हॉट्सअॅपवर पाठवायच्या नसतात, प्रत्यक्ष येऊन चर्चा करायची असते आणि त्यानंतर अध्यादेश काढायचा असतो. तुम्ही तिथून टाकणार आम्ही मग इथून सांगणार, याला काही अर्थ नाही. प्रत्यक्ष येऊन करायचे. मगच अध्यादेश निघाला पाहिजे, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.
मराठा आरक्षण मिळाले तरी मुंबई गाठणार, नाही मिळाले तरी जाणार
२० जानेवारी रोजी मनोज जरांगे पाटील मुंबईसाठी रवाना होत आहेत. यावर बोलताना मनोज जरांगे यांनी सांगितले की, आरक्षण मिळाले तरी मुंबईला जाणार आणि मिळाले नाही तरी मुंबईला जाणार. तोपर्यंत आरक्षण मिळाले तर गुलाल घेऊन जाऊ नाहीतर आणायला जाऊ, असा निर्धार मनोज जरांगे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, सरकारने भानावर यावे. आमच्या भानगडीत पडू नका. तुम्हाला गोडी गुलाबीने यावर तोडगा काढावा लागेल. आडमुठ्या भूमिकेत जाल, मुंबईत येऊ देणार नाही. आता मराठे संतापलेत. ५४ लाख लोकांच्या नोंदी सापडल्यात त्यांना प्रमाणपत्र द्या. सरकारने माझ्यावर ट्रॅप रचलाय, मी त्याला भीत नाही, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.