“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 19:52 IST2025-06-24T19:50:29+5:302025-06-24T19:52:06+5:30
Manoj Jarange Patil News: आम्ही १०० टक्के आरक्षण मिळवणार. मराठ्यांची काय लाट असते ते २९ ऑगस्टला पाहायला मिळेल. आता आम्ही मुंबई सोडत नाही. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
Manoj Jarange Patil News: महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीच्या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरून विरोधक सरकारवर टीका करत आहेत. साहित्यिक, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञही यासंदर्भात विरोध दर्शवत आहेत. अशातच त्रिभाषा सूत्रासंदर्भात साहित्यिक, भाषातज्ज्ञ, राजकीय नेते व सर्व संबंधितांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्रिभाषा सूत्रासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी एक बैठक पार पडली. यातच आता मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी यावरून सरकारला थेट सवाल केला आहे.
पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, हे मराठी राज्य आहे. इथे मराठीचीच जास्त सक्ती पाहिजे. ती भाषा सगळ्यांसाठी यायला पाहिजे. एक प्रकारे त्यांचेही म्हणणे बरोबर आहे, पण मराठीचे काय? देशभरात मराठीची सक्ती करणार आहेत का? ती पण मग करायला हवी. या राज्यांत ज्यांना मराठी येत नाही, त्यांना मराठी आली पाहिजे. त्यांच्याबद्दल सरकारची काय भूमिका आहे. ही गोष्टही खूप महत्त्वाची आहे. अनेक वेगवेगळे प्रश्न आहेत. परंतु, त्याहीपेक्षा आमचा आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. मराठा आरक्षणाच्याच प्रश्नावर आमचा जास्त फोकस आहे. ते झाल्यावर बाकीच्या प्रश्नांकडे बघू, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
आम्ही १०० टक्के आरक्षण मिळवणार
सरकार काय करत आहे, हे आम्हाला माहिती नाही. पण आरक्षणाची लढाई आम्ही जिंकणार. आरक्षण ओबीसीतून घेणार आणि समाजाला मिळवूनही देणार. मी आणि माझा समाज एकही पाऊल मागे सरकणार नाही. मराठ्यांची काय लाट असते, ते २९ ऑगस्टला तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्हाला कळेल, मराठे काय चीज असतात ते. आता आम्ही मुंबई सोडत नाही. मराठा आरक्षण १०० टक्के घेतल्याशिवाय माझ्यासकट एकही मराठी माघारी फिरणार नाही. तुमची मुंबई बंद पडेल की, सुरू राहील, ते आम्हाला माहिती नाही. परंतु, आम्ही १०० टक्के आरक्षण मिळवणार, असा एल्गार पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी बोलून दाखवला.
दरम्यान, बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, कुटुंबाची आणि समाजाची जी भावना आहे, तीच आमची भावना आहे. सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. असे होईपर्यंत आम्ही कुणीच शांत बसणार नाही. परंतु, या प्रकरणात सहआरोपी होणे गरजेचे आहे आणि ते व्हायलाच हवे. हा मुद्दा आम्ही कायम लावून धरणार आहोत. यांना न्यायदेवता कधीच सोडणार नाही, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.