गृहकर्जात महाराष्ट्र देशात टॉप, गेल्या वर्षाच्या तुलनेत १० टक्के वाढ; मोठ्या घरांच्या खरेदीकडे कल वाढला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 08:52 IST2026-02-25T08:51:10+5:302026-02-25T08:52:53+5:30
सोने कर्जाने वैयक्तिक कर्जाला मागे टाकले; महानगरांत घरकर्ज, ग्रामीण भागात वैयक्तिक-दुचाकी कर्जाला प्राधान्य, ऑक्टोबर-डिसेंबर २०२५ तिमाहीत गृहकर्ज १०.५ टक्क्यांनी वाढून ४३ लाख कोटी रुपयांवर गेले.

गृहकर्जात महाराष्ट्र देशात टॉप, गेल्या वर्षाच्या तुलनेत १० टक्के वाढ; मोठ्या घरांच्या खरेदीकडे कल वाढला
-चंद्रकांत दडस, मुंबई
देशातील गृहकर्ज बाजारात महाराष्ट्राने आपले वर्चस्व कायम ठेवले असून, डिसेंबर २०२५ अखेर राज्यातील एकूण गृहकर्ज तब्बल ९.५ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. वार्षिक आधारावर या गृहकर्जात १०.३ टक्के झाली आहे. यापाठोपाठ कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू आणि गुजरातने आघाडी घेतली आहे. 'सीआरआयएफ हाय मार्क'च्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
ऑक्टोबर-डिसेंबर २०२५ तिमाहीत गृहकर्ज १०.५ टक्क्यांनी वाढून ४३ लाख कोटी रुपयांवर गेले. सक्रिय गृहकर्ज खात्यांत ३.३ लाखांची वाढ झाली आहे.
९.५ लाख कोटींच्या १.८ टक्क्यांप्रमाणे अंदाजे १७,१०० कोटी रुपये इतकी कर्जे ३१ ते १८० दिवस विलंबित आहेत. राष्ट्रीय सरासरी (२.४ टक्के) पेक्षा महाराष्ट्रातील थकबाकी कमी आहे.
सोन्यावरील कर्जाला पसंती का?
भारतीयांनी सोन्यावरील कर्जाला सर्वाधिक पसंती दिली आहे. डिसेंबर २०२५ अखेर संपलेल्या तिमाहीत सुवर्ण कर्जाच्या थकीत रकमेने वैयक्तिक कर्जाला मागे टाकले आहे. सोन्याच्या कर्जात वार्षिक ४४.१ टक्के इतकी वार्षिक वाढ झाली आहे. सोने कर्जात तामळनाडूची आघाडी आहे.
लहान नको, मोठे कर्ज द्या
लोकांचा आता मोठ्या रकमेची कर्जे घेण्याकडे कल वाढला आहे. घराच्या कर्जाचा सरासरी आकार ३१ लाखांवरून ३३ लाख रुपयांपर्यंत वाढला आहे.

विशेष म्हणजे ७५ लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या गृहकर्जाचे प्रमाण एकूण वितरणात ४० टक्क्यांपर्यंत पोहोचले. सोन्यावरील कर्जाच्या बाबतीतही ५ लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची कर्जे घेणाऱ्यांचे प्रमाण वाढून ३६.५% झाले.
शहरे आणि ग्रामीण भागातील तफावत
गृहकर्ज आणि क्रेडिट कार्ड ही उत्पादने अजूनही मोठ्या शहरांपुरती मर्यादित आहेत. गृहकर्जाचे ५१.१ टक्के वितरण केवळ पहिल्या ८ शहरांत झाले आहे.
याउलट, वैयक्तिक कर्ज, दुचाकी कर्ज आणि ग्राहक उपयोगी वस्तूंच्या कर्जासाठी निमशहरी आणि ग्रामीण भागातून मोठी मागणी दिसून येत आहे.