Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 11:27 IST2025-06-27T11:25:28+5:302025-06-27T11:27:59+5:30
Maharashtra Politics : महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र येणार आहेत.

Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
Maharashtra Politics : महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी भाषेच्या सक्तिविरोधात ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्याविरोधात राज्यातील शिक्षण, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामधून विरोध अधिकच तीव्र झाला आहे. हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे भाऊ एकत्र येणार असून, एकच मोर्चा काढणार आहेत, अशी घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केली आहे. दरम्यान, यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. मनसे नेते प्रकाश महाजन यांनी यावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी या निर्णयाचे स्वागत करुन समाधान व्यक्त केले आहे.
दोन दिवसापूर्वी मनसे नेते प्रकाश महाजन यांनी मराठी मुद्द्यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यायला पाहिजे, अशी इच्छा व्यक्त केली होती. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले नाहीत, तर नियती त्यांना माफ करणार नाही, असं विधानही त्यांनी केले होते. ठाकरे बंधू एकत्र येण्यावर बोलताना प्रकाश महाजन म्हणाले, "मला अत्यंत आनंद झाला आहे. मी बातमी ऐकली, संजय राऊतांनी ट्वीटही केलं. राज ठाकरेंनी सर्व मराठी माणसांना आवाहन केलेल की, मराठीसाठी तुम्ही एकत्र या त्या आव्हानाला त्यांनी प्रतिसाद दिला आहे. मला याचा आनंद आहे. पुढे काय होईल, काय नाही भविष्य मी आज वर्तमानात सांगू शकत नाही. पण एक सुरुवात चांगली झाली. ज्या गोष्टीचे आम्ही स्वप्न पाहत होतो, ते स्वप्न पाहायला सुरुवात झाली, ज्या रस्त्यावर एकत्र चालावे असे वाटते होते, त्यावर पहिले पाऊल पडले आहे, असंही प्रकाश महाजन म्हणाले.
महाराष्ट्राच्या हितासाठी महत्वाचा निर्णय
हा निर्णय मराठी माणसांसाठी महत्वाचा आहे. मराठी माणसाच्या हक्कासाठी, मराठी भाषेसाठी, महाराष्ट्रासाठी हे खूप हिताचे आहे. प्रश्न भाषेचाच नाहीतर अजून मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आम्ही एकत्र लढा दिला तर निश्चित मराठी माणसाचं भलं होईल.", असंही महाजन म्हणाले.
"मराठी भाषेसाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आज मला बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेबांची आठवण आली. त्यांना किती आनंद झाला असेल, भाषेच्या प्रश्नावर का होईना, हे दोघे बंधू एकत्र आले. गेल्या १८ ते २० वर्षांत ठाकरे बंधूंचं एकत्र आंदोलन झाल्याचे आठवत नाही. त्यामुळे नव्या पिढीसाठी हे नवंच आहे. १४ जुलैची तारीख कधी येते, हे मी सगळं कधी पाहतोय याची मला उत्सुकता आहे. ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभणार आहे, असंही ते म्हणाले.