Maharashtra Politics : 'अजितदादा २० हजार मतांनी पराभूत, १५० मतदारसंघात गडबड'; शरद पवारांच्या आमदाराचा पुन्हा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 15:22 IST2024-12-29T15:21:04+5:302024-12-29T15:22:44+5:30
Maharashtra Politics : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी पुन्हा एकदा महायुतीच्या विजयाबाबत मोठा दावा केला आहे.

Maharashtra Politics : 'अजितदादा २० हजार मतांनी पराभूत, १५० मतदारसंघात गडबड'; शरद पवारांच्या आमदाराचा पुन्हा मोठा दावा
Maharashtra Politics ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. निकालानंतर विरोधकांकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त करण्यात आले होते.दोन दिवसापूर्वी निवडणूक आयोगाने ईव्हीएमवर स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान, आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी निवडणुकीच्या निकालावर संशय व्यक्त केला आहे. 'बारामतीमध्ये अजित पवार यांचा २० हजार मतांनी पराभव होणार होता, या निवडणुकीत १५० जागांवर गडबड केली असल्याचा दावाही जानकर यांनी केला.
आमदार उत्तम जानकर म्हणाले, आता जी निवडणूक घेतली आहे. या निवडणुकीत १५० मतदारसंघात गडबड केली आहे. यांचे मतदारसंघ किती आलेत ही माहिती काढल्यानंतर समोर आली आहे. यात अजितदादा सुद्धा २० हजार मतांनी पराभूत आहेत. अजितदादा यांनी जी १ लाख ८० हजार मत पडली आहेत त्यामध्ये वन थर्ड असं येथेही लावले होते. त्यामुळे युगेंद्र पवार यांची मत ८० हजार प्लस ६० अशी एक, चाळीस आहेत. आणि त्यांच्यामधील ६० वजा होतात म्हणजे अजिदादा एक लाख वीस वर राहतात. अजित पवार यांचे फक्त १२, शिंदेंचे १८ तर भाजपचे ७७ आमदार निवडून येणार होते. असे सगळे मिळून १०७ आमदार आहेत आणि दोन ते तीन अपक्ष आहेत, असा मोठा दावा जानकर यांनी केला.
"मी प्रत्येक मतदारसंघाचा अभ्यास केला आहे. जयकुमार गोरे यांच्याबाबतीत सुद्धी एकास पाच असं लावण्यात आलं होतं. गोरे यांना एक लाख ४८ हजार मत आणि घाटगेंना एक लाख तीन हजार तर त्या ठिकाणी त्यांचीसुद्धी तीस हजार मत चोरली. ती जर वजा केली तर १० हजार मतांचा फरक आहे, असंही जानकर म्हणाले.