Maharashtra Government: शरद पवारांनी पुन्हा टाकला 'बॉम्ब'; म्हणाले, 'सत्तास्थापनेचं भाजपा-शिवसेनेला विचारा'!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 11:49 AM2019-11-18T11:49:25+5:302019-11-18T12:23:24+5:30

शरद पवार आज दिल्लीत पोहोचले असून, त्यांनी महाशिवआघाडीच्या सरकारबद्दल सूचक विधान केलं आहे.

Maharashtra Election, Maharashtra Government: Sharad Pawar comments on maharashtra government | Maharashtra Government: शरद पवारांनी पुन्हा टाकला 'बॉम्ब'; म्हणाले, 'सत्तास्थापनेचं भाजपा-शिवसेनेला विचारा'!

Maharashtra Government: शरद पवारांनी पुन्हा टाकला 'बॉम्ब'; म्हणाले, 'सत्तास्थापनेचं भाजपा-शिवसेनेला विचारा'!

Next

मुंबईः विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाला जनतेनं स्पष्ट बहुमत देऊनही त्यांना अद्याप सरकार स्थापन करता आलेलं नाही. मुख्यमंत्रिपदावरून दोघांचं घोडं असलं असतानाच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर आता महाराष्ट्रात महाशिवआघाडीचं सरकार येणार असल्याची अटकळ बांधली जात आहे. त्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये बैठकाही सुरू आहेत. राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आलेला असतानाच खातेवाटप आणि इतर पदांबाबत शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीत सहमती होणे बाकी आहे, तसेच काँग्रेसबाबतचा निर्णय आता दिल्लीत होणार असल्याने सरकार स्थापनेस विलंब होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार आज दिल्लीत पोहोचले असून, त्यांनी महाशिवआघाडीच्या सरकारबद्दल सूचक विधान केलं आहे.

पत्रकारांनी शिवसेनेसोबत मिळून महाराष्ट्रात कधी सरकार बनवता आहात, असे विचारले असता पवार म्हणाले, महाराष्ट्रातल्या सरकारबद्दल शिवसेना-भाजपाला विचारा, शिवसेना-भाजपा वेगळे पक्ष आहेत, तसेच आमचे पक्षही वेगळ्या विचारधारेचे आहेत. “काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी स्वतंत्र लढली आणि शिवसेना-भाजप युती स्वतंत्र लढले. आता शिवसेनेला ठरवायचं आहे कोणासोबत जायचं आहे. संध्याकाळी सोनिया गांधी यांना भेटणार असल्याचंही पवारांनी सांगितलं आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार बनवणार आहे, असं शिवसेना म्हणत असल्याचं त्यांना विचारल्यावर त्यांनी उपरोधिका प्रतिसाद दिला. शिवसेनेसोबत सरकार बनवणार का याचं उत्तर शिवसेनेलाच विचार, असं म्हणत ते निघून गेले.  त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून महाशिवआघाडीमध्ये सरकार स्थापण्यावरून चर्चा सुरू असून, पवारांनी असं विधान केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

दुसरीकडे, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू असून, सरकार चालविण्यासाठी 40 कलमी किमान समान कार्यक्रम निश्चित करून तिन्ही पक्षांच्या श्रेष्ठींकडे पाठविला आहे. आता शरद पवार हे स्वत: सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. शिवसेनेला सरकारसाठी पाठिंबा देण्याची भूमिका सोनिया गांधी यांनी घ्यावी, यासाठी पवार त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करतील, असे समजते. काँग्रेस व राष्ट्रवादीचे राज्यातील नेते याबाबत शिवसेनेच्या नेत्यांशी सातत्याने चर्चा करीत आहेत. काँग्रेस सत्तेत सहभागी झाल्यास हे सरकार टिकेल, अशी अट राष्ट्रवादीने घातली होती. त्यासाठीच पवार आधी ज्येष्ठ काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्याशी व नंतर सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करतील.

>मुख्यमंत्रिपद सेनेकडेच
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या नेत्यांचे खातेवाटपावर जवळपास एकमत झाले असून, 5 वर्षे मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडेच राहणार असून, सेनेला 16, राष्ट्रवादी 14 तर काँग्रेसला 12 मंत्रिपदे मिळतील, अशी माहितीही सूत्रांकडून मिळाली आहे. शिवाय नगरविकास व अर्थ शिवसेनेकडे, गृहखाते राष्ट्रवादी तर महसूल काँग्रेसकडे राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
>आठवडाभरानंतरच चित्र स्पष्ट होणार
आणखी किमान आठवडाभर तरी सत्ता स्थापनेबाबतचे चित्र स्पष्ट होणार नाही. किमान समान कार्यक्रमावर तिन्ही पक्षांच्या नेतृत्वाची सहमती, मंत्रिपदे व महामहांडळांसह अन्य पदांच्या वाटपाचा फॉर्म्युला आणि मुख्यमंत्रिपदाच्या फॉर्म्युल्याबाबत अंतिम सहमती होण्यास वेळच लागणार आहे.

Web Title: Maharashtra Election, Maharashtra Government: Sharad Pawar comments on maharashtra government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.