Maharashtra Election 2019: प्रचारात मुद्द्याचं काय ते बोला!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 05:02 AM2019-10-13T05:02:41+5:302019-10-13T05:03:02+5:30

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून प्रचार टिपेला पोहोचला आहे

Maharashtra Election 2019: Talk about what's the point in the campaign! | Maharashtra Election 2019: प्रचारात मुद्द्याचं काय ते बोला!

Maharashtra Election 2019: प्रचारात मुद्द्याचं काय ते बोला!

Next

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून प्रचार टिपेला पोहोचला आहे. परंतु, सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबत मात्र कोणीच बोलत नाही, याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करून मुद्द्याचं काय ते बोला, असे वाचकांनी ठणकावले आहे. राज्याच्या तसेच स्थानिक विकासाच्या प्रश्नांची चर्चाच होत नसल्याने हा लबाडांचा प्रचार आहे, नुसतीच बनवाबनवी केली जाते, मतदारांना गृहित धरणाºया राजकारणी मंडळींच्या मनोरंजनाचा हा महोत्सव आहे, असा उद्वेग वाचकांनी व्यक्त केला.

प्रचाराचा रोखदेखील सगुणाकडून निर्गुणाकडे
सध्याच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सगुण प्रश्नांकडून निर्गुण प्रश्नांकडे जाण्याचा भाजपाचा प्रयत्न सुरु आहे. हिंदुत्व ही निर्गुण कल्पना आहे. अमित शहा सर्वत्र ३७० कलम रद्द केल्याचा प्रचार करीत फिरत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, कोलमडलेली अर्थव्यवस्था या प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. संविधानाने दिलेले लोकांचे मुलभूत स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे. दिल्लीतील पुण्याईवर महाराष्ट्रातील निवडणुका लढवल्या जात असतील तर त्याला काय अर्थ आहे?
सरकारच्या विरोधात बोलणाºयांना देशद्रोही ठरवले जात आहे. विरोधी पक्षांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. भ्रष्टाचारी लोकं संभाव्य भीतीने आधीच भाजपकडे पळत आहेत. भाजपमध्ये भ्रष्टाचाºयांबरोबरच गुन्हेगारांना आश्रय दिला जात आहे. निवडणूक स्थानिक विकासाभोवती असली पाहिजे. परंतु तसे होताना दिसत नाही. आचारसंहिता लागल्यानंतर शरद पवारांच्या चौैकशीचे आदेश दिले गेले. सत्तेचा असा वापर म्हणजे मनमानी नाही का? वैैयक्तिक आरोपांमुळे सामान्य लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. त्यांचे लक्षदेखील स्थानिक तसेच राज्याच्या विकासाच्या प्रश्नांवरुन विचलित होते. नेमकी हीच गोष्ट हेरुन सत्ताधाºयांकडून प्रचाराची रणनीती अवलंबली जात आहे की काय, असा प्रश्न पडतो. अलिकडेच बीड जिल्ह्यात झालेल्या दसरा मेळाव्यात बीड जिल्ह्यांतील जीवनमरणाच्या प्रश्नांवर बोलण्याऐवजी केंद्र सरकारने काय-काय कामे केली, त्यातही कलम ३७० काढून टाकल्यामुळे देशाचे कसे भले झाले, हेच उच्चारवाणे सांगितले गेले. दुसरीकडे, विरोधी पक्षात काहीच दम राहिलेला नाही. हा लोकशाहीला मोठा धोका आहे.


कोण देशाचा नागरिक आहे आणि नाही, हे ठरवण्याचा अधिकार सरकारने स्वत:च्या हाती घेतला आहे. सरकार निवडणुकांच्या तोंडावर नेहमीच अशा प्रकारची राजकीय खेळी करते आणि निवडणूक वेगळ्याच मुद्यांवर चालवली जाते. प्रचारात राजकीय आरोप-प्रत्यारोप करताना उमेदवार कोणतीही पातळी गाठायला तयार असतात. बरेचदा, राजकीय पक्षांमध्ये तडजोड झाली आहे की काय, असे वाटते. खरा विरोधी कोण आहे, हे पहिले पाहिजे.
- डॉ. कुमार सप्तर्षी,
ज्येष्ठ विचारवंत,
पुणे.


मुद्दे तर हरवलेतच;
पातळीही घसरली

प्रचार हा मुद्द्यावर करायचा असतो, याचाच विसर पडल्याचे चित्र दिसत आहे. मुद्दे तर शंभर टक्के हरविले आहेतच, पातळीही कमालीची घसरली आहे. विकासाऐवजी एकमेकांना धमकावण्याची, संपवण्याची भाषा नेत्यांच्या भाषणात आहे. जी जनता निवडून देणार आहे, तिच्या प्रश्नांपेक्षा नेत्यांमधाल वैयक्तिक हेवेदावेच जास्त महत्त्वाचे ठरत आहेत. मुळात विधानसभा निवडणूक ही राज्यातील स्थानिक प्रश्नांवर लढायची असते. परंतु सत्ताधारी पक्षाचे राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील नेते काश्मीर, पूर्वांचलसह राममंदिर, राफेल, राष्ट्रीय सुरक्षा या प्रश्नांवर आवाज उठविताना दिसतात.
कधीकाळी प्रथम क्रमांकाचे राज्य म्हणून मिरविणाºया महाराष्ट्राची आर्थिक स्थिती घसरली आहे. सिंचनाच्या आकड्यांचा भुलभुलैय्या आहे. शेतकºयांच्या आत्महत्या वाढत आहेत. तरुणांच्या हाताला रोजगार नाही. एमआयडीसीमध्ये आर्थिक मंदी आहे, उद्योग बंद होत आहेत. शिक्षणाच्या खासगीकरणामुळे शिक्षण घेणे आवाक्याबाहेर होत चालले आहे. दुष्काळ आणि अतिवृष्टीचा सामना करावा लागत आहे. परंतु या प्रश्नांबद्दल प्रचारात सत्ताधाºयांकडून अवाक्षरही काढले जात नाही. बँका बुडण्याचे जे सत्र सुरू आहे, त्यातून सर्वसामान्य माणूस हवालदिल झाला आहे, पण प्रचारात हा मुद्दाही दिसत नाही. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात महापुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. तसेच पूरग्रस्तांना मदत मिळण्याच्या धोरणांबाबतही सर्वांचीच चुप्पी आहे. प्रचारात जरी राष्ट्रीय पातळीवरील मुद्दे अग्रभागी आणण्याचा प्रयत्न होत असला तरी विरोधी पक्षांनी मात्र जनतेचे प्रश्न लावून धरले आहेत, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणावी लागेल. पण एकूणच प्रचाराकडे बारकाईने पाहिले तर एक तर फारच स्थानिक नाहीतर एकदम राष्ट्रीय असा प्रचाराचा स्तर दिसत आहे. गल्लीत गटार केली, हायमास्ट लावला, रस्ता केले अशी कामे जी नगरसेवक, ग्रामपंचायत व जिल्हा
परिषद सदस्य करतो, ती आपण केली असा प्रचार जोरजोरात होताना दिसत आहे.
- प्रा.भारती पाटील,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.

कशाचाच
कशाला मेळ नाही

सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असून त्यामध्ये कशाचाच कशाला मेळ नाही असे दिसते. एकतर सर्रास जात-पात, धर्म, संपत्ती याचा वापर होत असून दिशाभूल करणारी आश्वासने दिली जात आहेत.एकमेकांवर खालच्या पातळीवर टीका केली जात आहे. त्याचबरोबर निवडणूक विधानसभेची असताना राष्टÑीय मुद्दे चर्चिले जात आहेत. राज्याचा विकास अथवा पायाभूत आराखडा कुठे दिसत नाही. एकंदर दिशाभूलच सुरू आहे.
- विकास हरिभाऊ दळवी,
ओम कादंबरी हौ. सोसायटी,
पाडा न. ३, लोकमान्यनगर ठाणे (प.)


मूलभूत प्रश्नांना सर्वांचीच बगल
सध्याच्या निवडणूक प्रचारात सत्ताधारी व विरोधकांकडून जनतेच्या मुलभूत प्रश्नांना महत्त्व दिले जात नाही. भावनिक, राजकीय हेवेदावे, वैयक्तीक टीका यावरच भर दिला जात आहे. काश्मीरमधील कलम रद्द करण्याबाबत निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, आर्थिक मंदी या समस्या आ वासून उभ्या आहेत. पीएमसी बँक घोटाळा वा इतर अनेक प्रकरणांमध्ये नागरिक भरडले जात आहेत. विरोधी पक्षांनी शासनावर अंकुश ठेवला पाहिजे , परंतु आपले कर्तव्य पार पाण्याऐवजी अनेक मोठे विरोधी नेते सत्तेसाठी सत्तारूढ पक्षात सामील होत आहे. शासनावर कजार्चा बोजा प्रचंड आहे. शेतकरी, व्यापारी हवालदिल झाला आहे. विरोधी पक्षाची क्षीण होत चाललेली शक्ती पाहून सत्ताधारी विकासाच्या मुद्दयावर भर देण्याऐवजी भावनिक मुद्दे मांडत आहे. सत्ताधारी निश्चिंत आहे. प्रचार भरकटला आहे व बुद्धीजीवी राजकारणापासून दूर होत आहे. राज्याचे व नागरिकांचे हित संरक्षण याबाबत गांभीर्याने विचार केला पाहिजे.
- अशोकराव टाव्हरे, सद्गुरूनगर, भोसरी, पुणे.

... प्रचार म्हणजे
म्हैस चोरांची गोष्ट

सध्याच्या प्रचाराला म्हैस चोरांची गोष्ट तंतोतंत लागू होते. म्हैस चोरल्यानंतर एक चोर म्हैस घेऊन एका दिशेने पळतो, तर दुसरा चोर म्हशीच्या गळ्यातील घंटा वाजवत विरुद्ध दिशेने पळतो. चोराला पकडण्यासाठी पाठलाग करणारी माणसे इथेच धोका खातात. ती म्हैस म्हणजे वाढती बेरोजगारी, भाववाढ, आर्थिक मंदी, शेतकºयांच्या आत्महत्या. म्हशीच्या गळ्यातील घंटा म्हणजे कलम ३७०, राम मंदिर, राफेल घोटाळा. राजकारणी जनतेच्या भावनिकतेचा पुरेपूर फायदा करून घेतात. एकमेकांवरील चिखलफेक हा सत्तेसाठीचा खेळ आहे.
- सावता नवनाथ खरे,
चकलांबा, ता. गेवराई, जि. बीड.

...हा तर लबाडांचा प्रचार
आज जाहिरनामापेक्षा व्यक्तीपूजा महत्त्वाची ठरत आहे. विकासाच्या मुद्द्यांपेक्षा भावनिक मुद्दे वरचढ ठरत आहेत. भारत स्वतंत्र झाल्यापासून जम्मू-काश्मीर हा भारताचाच अविभाज्य भाग आहे. सध्या पाकिस्तान द्वेष म्हणजे राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम अशीच शिकवण दिली जात आहे. लष्कराचा पराक्रम म्हणजे राजकीय पक्षांचा पराक्रम समजला जात आहे. लबाडांच्या या भावनिक प्रचाराला जनता बळी पडत आहे. हे बुद्ध, महावीर, गांधी यांच्या देशाला शोभून दिसत नाही. मतदारांनी राज्याचा भागाच्या विकासाचा विचार करुनच मतदान करावे.
- राठोड एम. आर. - नांदेड.

राष्ट्रहित महत्त्वाचेच; परंतु स्थानिक विकासाच्या प्रश्नांवर बोला
राष्ट्रहित महत्त्वाचे आहेच, पण इतर अनेक प्रश्न आहेत त्याचे काय? आज मराठवाड्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यावर काही ठोस उपाययोजना नाही. हिंगोली जिल्हा होऊन २० वर्षें झाली, या जिल्ह्यात एकही विधी, वैद्यकीय महाविद्यालय नाही. उद्योग नसलेला जिल्हा, म्हणून हिंगोलीची ओळख आहे. परभणी शहराला महिन्यातून एक दिवस पाणीपुरवठा केला जातो. किती गंभीर प्रश्न आहेत हे? परंतु हे सर्व प्रश्न सोडविणार कोण? राजकीय पक्ष केवळ पोकळ आश्वासने देतील, आपणही भूलथापांना बळी पडून सगळे विसरून पुन्हा तोच कित्ता गिरवणार हे नक्की!
- सचिन द. कांबळे,
न. प. वसाहत, हिंगोली.

Web Title: Maharashtra Election 2019: Talk about what's the point in the campaign!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.