महाराष्ट्राचे प्रेम हीच माझी ऊर्जा : शरद पवार; राज्यातील तमाम जनतेला उद्देशून लिहिले भावनिक पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 11:55 IST2026-03-08T11:54:46+5:302026-03-08T11:55:29+5:30
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यसभेसाठी अर्ज भरल्यानंतर राज्यातील जनतेचे आभार मानणारे एक भावनिक पत्र लिहिले आहे.

महाराष्ट्राचे प्रेम हीच माझी ऊर्जा : शरद पवार; राज्यातील तमाम जनतेला उद्देशून लिहिले भावनिक पत्र
मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यसभेसाठी अर्ज भरल्यानंतर राज्यातील जनतेचे आभार मानणारे एक भावनिक पत्र लिहिले आहे. महाराष्ट्राचे प्रेम हीच माझी ऊर्जा आहे. सध्या प्रकृतीच्या कारणामुळे डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्याने प्रत्यक्ष भेटीगाठी शक्य नसल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांनी समाजमाध्यमावर हे पत्र प्रसिद्ध केले आहे. आजारपणामुळे पवारांनी घरूनच उमेदवारी अर्ज भरला होता.
आतापर्यंत राजकीय क्षेत्रात विविध जबाबदाऱ्या पार पाडताना महाराष्ट्राच्या तसेच देशाच्या विकासासाठी सकारात्मक काम करता आले, यामागे जनतेचा विश्वास आणि पाठिंबा हेच सर्वांत मोठे बळ राहिले.
महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा पुढील सहा वर्षे सेवा करण्याची संधी देऊन विश्वास दाखवला, असे नमूद करून पवार यांनी पत्रात राज्यातील जनतेचे आणि मित्रपक्षांचे आभार
मानले आहेत.
राजकीय प्रवास जनतेमुळे
सन १९६७ मध्ये प्रथमच महाराष्ट्र विधानसभेवर निवडून जाण्याची संधी मिळाल्यापासून आजपर्यंत जनतेच्या विश्वासामुळेच हा राजकीय प्रवास अखंडपणे सुरू राहिला. प्रदीर्घ राजकीय वाटचालीत राज्यात मंत्री, मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता अशा जबाबदाऱ्या सांभाळण्याची संधी मिळाली, तर केंद्रात संरक्षणमंत्री आणि दहा वर्षे कृषिमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली, असा उल्लेख पत्रात आहे.
...हे माझे भाग्य
महाराष्ट्राने दिलेले प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच आपल्या आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत आहेत. राज्याच्या विकासासाठी आयुष्यभर काम करण्याची संधी मिळणे हे आपले भाग्य आहे. पुढील काळातही जनतेच्या अपेक्षांना न्याय देत प्रामाणिकपणे सेवा करत राहीन, असा निर्धार केला आहे.