बिबट्यांची प्रजा वाढली; २० हजार शेतकऱ्यांनी पंतप्रधान मोदींना पत्रे पाठवली, केली ‘ही’ मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 18:46 IST2026-02-24T18:46:48+5:302026-02-24T18:46:48+5:30
बिबट्यांची वाढती संख्या अत्यंत चिंताजनक असून, त्यामुळे अनेक भागांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बिबट्यांची प्रजा वाढली; २० हजार शेतकऱ्यांनी पंतप्रधान मोदींना पत्रे पाठवली, केली ‘ही’ मागणी
Wildlife Law News: बिबट्यांची वाढती संख्या अत्यंत चिंताजनक बनल्याने केंद्र शासनाने वन्यजीव कायद्यात तातडीने बदल करण्याची गरज आहे. बिबट्यामुळे मोठ्या संख्येने लहान मुले व शेतकऱ्यांचे जीव धोक्यात आले आहेत. त्यामुळे हातावर हात ठेवून बसणे अशक्य बनले आहे. कायद्यात बदल करा किंवा धोरणात्मक निर्णय घ्यावा, यासाठी शेतकऱ्यांची स्वाक्षरी पत्रे पाठवण्यात आली आहेत, अशी माहिती माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली.
राहुरीतील शेतकरी माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली आज मोर्चा काढत टपाल कार्यालयावर धडकले. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी केंद्र सरकारने वन्यजीव कायद्यात तातडीने बदल करावा किंवा धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करणारी तब्बल २० हजार शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीची पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राहुरीतून पाठवण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी या मोर्चा सहभागी झाले होते.
...त्यामुळे पंतप्रधानांना साकडे घालावे लागत आहे
दिवसाढवळ्या डोळ्या देखत अनेक घटना घडत असताना कोणतीही उपाय योजना घेता येत नाही. रात्री शेतकऱ्यांना बिबट्याची मोठी भीती असते. राहुरी तालुक्यातील बहुतांशी गावामध्ये बिबट्यांचा वावर वाढला आहे. लहान मुले, शेतकरी यांचा हकनाक बळी जात आहे, बिबट्यांना ठार मारण्याची कायद्यात तरतूद नाही. एकीकडे कायद्यान्वये बिबट्यांना संरक्षण मिळते. आता नागरिकांना संरक्षण मिळण्याची गरज आहे. मंत्र्यांकडून गोलगोल उत्तरे दिली जात असून, केंद्राकडे बोट दाखवले जाते. त्यामुळे पंतप्रधानांना साकडे घालावे लागत आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, राहुरी तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठे आहे. ऊस तुटून गेल्यानंतर बिबट्यांनी शहराकडे मोर्चा वळवला आहे. दिवसाढवळ्या शहरातून बिबटे दिसल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. आणखीन अप्रिय घटना घडण्याआधी केंद्र सरकारने ठोस पावले उचलावी. केवळ राहुरीत नव्हे तर राज्यातही बिबट्यांच्या हल्ल्याच्या अनेक घटना घडत आहेत. त्यांची प्रजनन क्षमता कमी करणे व पकडल्यानंतर वनतारात नेणे अशा प्राथमिक उपयोजना तरी हाती घ्याव्यात. कुटुंबातील महिलेसमोरच लहान मुलांना उचलून बिबट्या उचलून घेऊन जात आहे. मृत्युमुखी पडलेल्या बालकांची संख्याही मोठी आहे. या सर्व घटना अत्यंत वेदनादायक आहेत. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, असे त्यांनी सांगितले.