दरडोई निव्वळ उत्पन्नात कोल्हापूरची भरारी; राज्यात टॉप टेनमध्ये समावेश
By भीमगोंड देसाई | Updated: March 9, 2026 12:21 IST2026-03-09T12:20:33+5:302026-03-09T12:21:08+5:30
महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालातून पुढे : शेती उत्पादन, संपर्क यंत्रणा सक्षम झाल्याने सकारात्मक परिणाम

दरडोई निव्वळ उत्पन्नात कोल्हापूरची भरारी; राज्यात टॉप टेनमध्ये समावेश
भीमगोंडा देसाई
कोल्हापूर : राज्यातील निव्वळ दरडोई उत्पन्नाच्या यादीत कोल्हापूर जिल्हा टॉप टेनमध्ये आला आहे. राज्यात पहिल्या क्रमांकावर मुंबई, तर सहाव्या क्रमांकावर कोल्हापूर आहे. राज्यात सर्वांत कमी उत्पन्नाचा जिल्हा नंदूरबार आहे. दरम्यान, पुणे विभागात कोल्हापूर दुसऱ्या क्रमांकावर आहे. शिवाय कोल्हापूरचे दरडोई उत्पन्न सन २०२३-२४च्या तुलनेत सन २०२४-२५ मध्ये ३५ हजार २६३ रुपयांनी वाढले आहे. जिल्ह्यातील औद्योगिक, कृषी, दुग्धव्यवसाय, सेवा क्षेत्रातील सातत्यामुळे उत्पन्नवाढीचा वेग कोल्हापूरने कायम ठेवला आहे.
राज्य शासनाचा आर्थिक पाहणी अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. या अहवालानुसार जिल्ह्यातील निव्वळ दरडोई उत्पन्नात सन २०२१-२२ च्या तुलनेत सन २०२४-२५ मध्ये १ लाख १ हजार ८०८, तर पुण्याची १ लाख ३३ हजार ८१७ रुपयांची वाढ झाली आहे.
साखर उद्योग, दुग्धव्यवसाय, लघू आणि मध्यम उद्योगांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळत आहे. शहर आणि परिसरात विकसित झालेल्या औद्योगिक वसाहती, उद्योगांचा विस्तार, फाउंड्री हब, शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील उद्योग, हुपरीतील चांदी व्यवसाय, इचलकरंजीतील वस्त्रोद्याेग, बांधकाम क्षेत्राचा विस्तार, व्यापार क्षेत्रामुळे जिल्ह्याच्या उत्पन्नात वाढ होत आहे.
सन २०२४-२५ मधील राज्यातील निव्वळ दरडोई उत्पन्नातील जिल्हे अनुक्रमे कंसात उत्पन्नाची आकडेवारी अशी :
मुंंबई (५१७८७५) , ठाणे (४४४२८३), पुणे (४२६७२०), नागपूर (३६७८०५), रायगड (३५७५८१), कोल्हापूर (३२४४४४), सांगली (३०४२३३), नाशिक (३००२६०), सोलापूर (२८९५५८), छत्रपती संभाजीनगर (२७९९३०).
...तर ‘कोल्हापूर नंबर वन’वर
पुणे विभागात पाच जिल्हे येतात. निव्वळ दरडाेई उत्पन्नात पुणे एक नंबरला, तर कोल्हापूर निव्वळ दरडोई उत्पन्नात दुसऱ्या क्रमांकावर आहे. पुणे विभाग आणि राज्यात मेट्रो, काॅर्पोरेट आणि बहुउद्देशीय कंपन्या असलेली शहरे दरडोई उत्पन्नात आघाडीवर आहेत, याची उणीव कोल्हापूर जिल्ह्यात दिसते.
मोठे उद्योग, दळणवळणाच्या सुविधा चांगल्या असतील तर रोजगारनिर्मिती वाढते. दरडोई उत्पन्नात भर पडते. कोल्हापूर जिल्ह्यात अलीकडच्या काळात संपर्काच्या यंत्रणा सक्षम झाल्या आहेत. शेतीआधारित उद्योग वाढत आहेत, आदी कारणांमुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या निव्वळ दरडोई उत्पन्नात वाढ झाली आहे. कोल्हापुरात एखादी मोठी बहुउद्देशीय कॉर्पोरेट कंपनी आली तर पुन्हा कोल्हापूरचे स्थान राज्यात वर असेल. - विजय ककडे, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, कोल्हापूर