किसान सन्मान निधीत लवकरच होणार तीन हजारांची वाढ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
By आनंद डेकाटे | Updated: February 24, 2025 19:53 IST2025-02-24T19:52:23+5:302025-02-24T19:53:06+5:30
Kisan Sanman Nidhi: राज्य सरकारही केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना ‘नमो किसान सन्मान निधी योजनें‘तर्गत ६ हजार रुपये देत असून लवकरच हे अर्थसहाय ३ हजार रुपयांनी वाढविण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे केली.

किसान सन्मान निधीत लवकरच होणार तीन हजारांची वाढ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
- आनंद डेकाटे
नागपूर - राज्य सरकारही केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना ‘नमो किसान सन्मान निधी योजनें‘तर्गत ६ हजार रुपये देत असून लवकरच हे अर्थसहाय ३ हजार रुपयांनी वाढविण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भागलपूर, बिहार येथे ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १९ व्या हप्त्याचे वितरण’ झाले. वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वनामती येथील कै. वसंतराव नाईक स्मृती सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आ. कृष्णा खोपडे, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, प्रभारी विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे, कृषी आयुक्त सुरज मांढरे, वनामतीचे प्रभारी संचालक रविंद्र ठाकरे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणीस म्हणाले, पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे केंद्र शासन वर्षाला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट ६ हजार रुपये वितरित करते. तर राज्य शासनाच्या वतीने ‘नमो किसान सन्मान निधी योजनेद्वारे’ शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आता राज्य शासन या निधीत ३ हजार रुपयांनी वाढ करणार असून राज्याद्वारे ९ हजार आणि केंद्र शासनाचे ६ हजार असे शेतकऱ्यांना आता वर्षाला १५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. तसेच प्रगतीशील शेतकऱ्यांना गौरविण्यात आले.
वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प शेतीचे चित्र बदलणार
विदर्भातील शेतीचे चित्र बदलणारा वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. याद्वारे नागपूर, अमरावती, वर्धा, अकोला, बुलडाणा अशा एकूण ७ जिल्ह्यांमध्ये दुष्काळी भागाला याचा फायदा होणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
कृषिमंत्री कोकाटे यांची अनुपस्थिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किसान सन्मान निधीच्या वितरणाचा कार्यक्रम होता. नागपुरातील कार्यक्रम हा राज्यस्तरीय होता. स्वत: मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते. परंतु कृषी विभागाशी संबंधित असलेल्या या कार्यक्रमात राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे मात्र उपस्थित नव्हते. कार्यक्रमस्थळी याची चर्चा रंगली होती.