Raj Thackeray: 'जवानांनी 'एअर स्ट्राईक' केला, पण जंगलात... दहशतवादी मेलेच नाहीत'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 19:38 IST2019-03-09T19:37:10+5:302019-03-09T19:38:19+5:30
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी बालाकोट येथे झालेल्या एअर स्ट्राइकवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Raj Thackeray: 'जवानांनी 'एअर स्ट्राईक' केला, पण जंगलात... दहशतवादी मेलेच नाहीत'
मुंबई - भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकवरून देशात राजकारण सुरू आहे. दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी बालाकोट येथे झालेल्या एअर स्ट्राइकवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने एकर स्ट्राइक केला. पण त्यांना चुकीची माहिती दिली गेली. त्यामुळे बाँम्ब जंगलात पडले. त्यामुळे दहशतवादी मेलेच नाहीत, असा दावा राज ठाकरे यांनी केला आहे.
पुलवामा येथील दहशतवादी हल्ला, त्यानंतर झालेली एअर स्ट्राइक, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाने दाखवलेल्या देशभक्तीवर राज ठाकरे यांनी चौफेर टीका केली. पुलवामा हल्ल्यावेळी सीआरपीएफने केलेली विमान प्रवासाची विनंती फेटाळली गेली, याबाबत राज ठाकरेंनी शंका उपस्थित केली. तसेच अजित डोभालांच्या मुलाच्या कंपनीत पाकिस्तानी व्यक्तीच्या असलेल्या भागीदारीविषयी राज यांनी सवाल उपस्थित केला.
यावेळी राज ठाकरे यांनी एअर स्ट्राइकमध्ये दहशतवाद्यांच्या झालेल्या मृत्यूबाबतही शंका उपस्थित केली. ते म्हणाले की, ''कुठलेही लष्कर हे माहितीच्या आधारावर कारवाई करते. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने एकर स्ट्राइक केला. पण त्यांना चुकीची माहिती दिली गेली. त्यामुळे बाँम्ब जंगलात पडले. त्यामुळे दहशतवादी मेलेच नाहीत.''
दरम्यान, पुढच्या काळातही पुलवामासारखा एखादा हल्ला घडवला जाईल, असा दावा राज ठाकरे यांनी केला. ''पुढच्या महिन्या दीड महिन्यात असाच एक पुलवामासारखा हल्ला घडवला जाईल, मग पुन्हा राष्ट्रभक्तीची भाषणं केली जातील. मग पुन्हा देशभक्तीचे वारे वाहतील. कारण या सरकारने दिलेली सर्व आश्वासने अपयशी ठरली आहेत.'' असे ते म्हणाले.