पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 14:22 IST2025-06-15T14:22:26+5:302025-06-15T14:22:43+5:30
राज्यात वीज पडून धुळे येथे १, नाशिक १, संभाजी नगर ४, नंदुरबार १, अमरावती १ असे एकूण ८ जण दगावले आहेत तर १० जण जखमी आहेत.

पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
मुंबई - राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. त्यात हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासाकरता रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांना रेड अलर्ट तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट प्रशासनाने जारी केला आहे. त्याशिवाय आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी NDRF,SDRF टीमला सतर्क राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
पालघर, ठाणे, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट आणि सिंधुदुर्ग या परिसरात प्रशासनाकडून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सध्या राज्यातील बऱ्याच जिल्ह्यात पाऊस सुरू असून पूर परिस्थिती नियंत्रणात आहे. मागील २४ तासांत रत्नागिरीत ८८.१ मिमी, रायगड ६५.३ मिमी, सिंधुदुर्ग ५३.८ मिमी, ठाणे २९.६ मिमी, यवतमाळ १७.५ मिमी पाऊस पडलेला आहे. त्याशिवाय राज्यात वीज पडून धुळे येथे १, नाशिक १, संभाजी नगर ४, नंदुरबार १, अमरावती १ असे एकूण ८ जण दगावले आहेत तर १० जण जखमी आहेत. मान्सूनच्या प्रवासात प्रगती नसली तरी राज्याच्या बहुतांश भागात, विशेषत: मध्य महाराष्ट्र आणि कोकण पट्ट्यात काही ठिकाणी मात्र तो कोसळत आहे.
४० वर्षांत प्रथमच जूनमध्येच भरले सीना धरण
सीना नदीचे उगमस्थान तसेच प्रवाह परिसरात मे महिन्यातच वारंवार जोरदार पाऊस झाल्याने यंदा प्रथमच अहिल्यानगर जिल्ह्यातील निमगाव गांगर्डा येथील सीना धरण जूनमध्येच भरले असून सांडव्यातून पाणी वाहू लागले आहे. गेल्या ४० वर्षांत प्रथमच मान्सूनच्या प्रारंभी जूनमध्येच धरण भरले आहे. सीना धरण भरले असल्याची अधिकृत माहिती तहसीलदार गुरू बिराजदार यांनी दिली
मुंबईतही पावसाचा जोर
शनिवारी संध्याकाळपासून मुंबई शहरात सतत पाऊस पडत आहे. हवामान विभागाने मुंबईत यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबईत रात्रभर विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत होता. मात्र रविवारी सकाळपासून पावसाचा वेग मंदावला. शहरात कुठेही पाणी साचल्याच्या सूचना मिळाल्या नाहीत असं अधिकाऱ्यांनी सांगितले.