"तोच विनोद पुन्हा पुन्हा केला तर..."; राहुल गांधींच्या आरोपावर सीएम देवेंद्र फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 14:16 IST2025-02-07T14:14:59+5:302025-02-07T14:16:15+5:30
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.

"तोच विनोद पुन्हा पुन्हा केला तर..."; राहुल गांधींच्या आरोपावर सीएम देवेंद्र फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर
Devendra Fadnavis ( Marathi News ) : लोकसभेचे विरोधी पक्षेनेते राहुल गांधी यांनी आज महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीवरुन निवडणूक आयोग आणि भाजपावर गंभीर आरोप केले. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत या तीन नेत्यांनी नवी दिल्ली इथं पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. "महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काहीतरी गडबड झाली असल्यानेच आम्ही विचारलेल्या प्रश्नांना निवडणूक आयोगाकडून उत्तर दिलं जात नाही," असा आरोप राहुल गांधी यांनी केला, या आरोपाला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन एका वाक्यात प्रत्युत्तर दिले आहे.
सखोल अभ्यास केला, महाराष्ट्राच्या निवडणुकीत गडबड झालीय; राहुल गांधी-सुळे-राऊतांचा आरोप
खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात ट्विट करुन प्रत्युत्तर दिले. 'तोच तोच विनोद पुन्हा पुन्हा सांगितला तर तेव्हा आपण हसत नाही, असं ट्विटमध्ये करत गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.
जब एक ही चुटकुला बार-बार सुनाया जाए तो उसपर हंसा नहीं करते!#RahulGandhi@RahulGandhi
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 7, 2025
राहुल गांधी-सुळे-राऊतांचा आरोप
निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत राहुल गांधी म्हणाले की, "महाराष्ट्रात पाच वर्षांत जितक्या नव्या मतदारांची नोंद झाली नाही, त्यापेक्षा अधिक मतदार शेवटच्या पाच महिन्यांत नोंदवले गेले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान ३९ लाख नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली. म्हणजे हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येपेक्षाही अधिक मतदार या कालावधीत नोंदवण्यात आले. हे मतदार नेमके आले कुठून?" असा सवाल राहुल यांनी उपस्थित केला आहे.
"सरकारच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील प्रौढ लोकसंख्या ९. ५४ कोटी इतकी आहे. मात्र निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं आहे की महाराष्ट्रात ९.७० कोटी इतके मतदार आहेत. म्हणजे महाराष्ट्रातील एकूण प्रौढ लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या अधिक असल्याचा दावा आयोगाने केला आहे. विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी ६ वाजल्यानंतर तब्बल १२ टक्के मतदान वाढल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं आहे. आम्ही मागील काही दिवसांत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालाचा सविस्तर अभ्यास केला आहे. या निवडणुकीत काहीतरी गोंधळ नक्कीच झाला आहे. महाराष्ट्रातील मतदार याद्यांमध्ये अनियमितता आढळली आहे," असा आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे.