भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 07:08 IST2025-06-20T07:08:21+5:302025-06-20T07:08:54+5:30
Uddhav Thackeray vs Eknath Shinde: राज्यात हिंदी भाषेवरून चांगलेच राजकारण तापले आहे.

भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जे जनतेच्या मनात आहे ते होऊ नये आणि मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये यासाठी काही जण हॉटेलमध्ये गाठीभेटी घेत आहेत. आमचे काय करायचे ते आम्ही पाहून घेऊ. जे जनतेच्या, राज्याच्या मनात आहे तेच मी करेन, असे प्रतिपादन उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी वर्धापन दिन मेळाव्यात केले. हिंदी सक्ती करून बघा. अंगावर येणार असाल तर मी उभा आहे. कम ऑन किल मी. पण, येताना ॲम्ब्युलन्स घेऊन या. येताना सरळ याल; परंतु, जाताना आडवे व्हाल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. षण्मुखानंद हॉलमध्ये उद्धवसेनेचा ५९ वा वर्धापन दिन साजरा झाला. यावेळी ठाकरे यांनी मनसेशी युती करण्याचे संकेत दिले.
जे तुमच्या, महाराष्ट्राच्या मनात ते करायला तयार- उद्धव ठाकरे
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत. जे तुमच्या, महाराष्ट्राच्या मनात आहे ते करायला तयार आहे, असे ते म्हणाले. काहीही झाले तरी मुंबई त्यांच्या हाती देणार नाही. शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचे प्रयत्न कराल तर भाजपचे नामोनिशान पुसून टाकू, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
एकनाथ शिंदेंचा पलटवार
माणसाचे दिवस कधी बदलतील सांगू शकत नाही, सत्तेत होते तेव्हा सगळ्यांना कस्पटासमान समजणाऱ्यांची आज काय अवस्था झाली आहे, माझ्याशी युती करता का म्हणून आज ते किती अगतिक, उतावीळ आणि लाचार झाले आहेत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री आणि शिंदेसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला.
मरे हुए को क्या मारना है- एकनाथ शिंदे
पक्षाच्या वर्धापनदिन मेळाव्यात ठाकरेंना प्रत्युत्तर देताना शिंदे म्हणाले, ते म्हणाले कम ऑन किल मी, पण मरे हुए को क्या मारना है, महाराष्ट्राने विधानसभा निवडणुकीत तुमचा मुडदा पाडला आहे. मारायला आलात तर ॲम्बुलन्स घेऊन या असेही म्हणाले, पण नुसता करून शोर मनगटात येत नाही जोर, वाघाचे कातडे पांघरून लांडगा वाघ होत नाही, त्याला शेर का कलेजा लागतो.
विधानसभा जिंकलो म्हणून गाफील राहू नका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही महायुती म्हणून लढायच्या असल्याचे शिंदे यांनी जाहीर केले. उबाठाचे मुंबईतील ५० नगरसेवक व इतर पक्षाचे मिळून ६५ माजी नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले आहेत. तुम्ही निडणुकीच्या कामाला लागा. विधानसभा जिंकलो म्हणून गाफील राहू नका, प्रत्येक निवडणूक जिंकायची, असेही शिंदे म्हणाले.