"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 10:43 IST2025-06-30T10:42:38+5:302025-06-30T10:43:58+5:30

हिंदी सक्ती मागे घेऊन देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदाच शहाणपणाचा निर्णय घेतला.  यापुढे जेव्हा जेव्हा ठाकरे बंधू एकत्र येतील तेव्हा प्रत्येक वेळी सरकारला मागे हटावे लागेल असं संजय राऊतांनी म्हटलं.

Hindi Compulsion Issue: "The government retreated before the power of the Raj and Uddhav Thackeray brothers; this is the first step towards victory, Sanjay Raut Target Devendra Fadnavis | "ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."

"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."

मुंबई - ठाकरे बंधू यांच्या ताकदीपुढे राज्य सरकारनं हिंदी सक्ती निर्णय मागे घेतली. २ भाऊ एकत्र आल्यानंतर मराठी ताकदीचा जो भूकंप होणार होता त्या भीतीने राज्य सरकारने ही भूमिका घेतली हे स्पष्ट आहे. ही विजयाची पहिली पायरी आहे. यापुढे एकत्र येऊन आम्हाला असेच विजय प्राप्त करायचे आहेत. ज्यादिवशी राज ठाकरेंनी एकत्र येण्याची साद घातली त्यानंतर १० मिनिटांत उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मराठीच्या प्रत्येक लढ्यात ठाकरे एकत्र असतील. मुंबईसह महाराष्ट्राची सत्ता मराठी माणसांच्या हातात असावी ही आमची इच्छा आहे असं सांगत उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर भाष्य केले. 

खासदार संजय राऊत म्हणाले की, जर देवेंद्र फडणवीस आणि प्रफुल पटेल एकत्र येऊ शकतात. फडणवीस-शिंदे, फडणवीस-हसन मुश्रीफ एकत्र येत असतील तर दोन भाऊ एकत्र आल्यावर तुम्हाला पोटदुखी का होते, एकाच विचाराचे नेते एकत्र आल्यानंतर तुम्हाला नैराश्य आले आहे, वैफल्यग्रस्त होत आहात. कधीकाळी एकनाथ शिंदे हेदेखील देवेंद्र फडणवीसांना भ्रष्टाचारी म्हणत होते. अजित पवारांना तुरुंगात टाकू असं फडणवीस बोलत होते. त्यामुळे आम्हाला भूतकाळात जायला लावू नका. कोण टिकलंय, कोण वाढतंय आणि कोण पुढे जातंय हे येणाऱ्या भविष्य काळात तुम्हाला कळेलच असा टोला त्यांनी शिंदेंच्या यांच्या टीकेवर लगावला. 

तसेच हिंदी सक्ती मागे घेऊन देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदाच शहाणपणाचा निर्णय घेतला.  यापुढे जेव्हा जेव्हा ठाकरे बंधू एकत्र येतील तेव्हा प्रत्येक वेळी सरकारला मागे हटावे लागेल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित मोर्चाची घोषणा झाल्यावर सरकारने धसका घेतला होता. महाराष्ट्रातून लाखो मराठी लोक या मोर्चाला येणार होते. त्यामुळे सरकारने हा निर्णय मागे घेतला. त्रिभाषा सूत्र आम्ही स्वीकारणारच नाही. त्यामुळे समितीचा खेळ मराठी माणसांसोबत का खेळता? दोन ठाकरे बंधूंनी समितीच्या घोषणेवर पक्का निर्णय दिल्यानंतर उगाचच फडणवीस सरकारने फालतू खेळ करू नये असंही संजय राऊत यांनी म्हटलं. 

५ जुलैला होणारा विजयी जल्लोष, राज ठाकरे सहभागी होणार का?

दरम्यान, ५ जुलैला राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येणे हे महाराष्ट्रासाठी फार मोठे आकर्षण होते. ही ताकद दाखवण्याचा मार्ग होता त्यामुळेच सरकारने अध्यादेश मागे घेतला. या मोर्चाची तयारी सुरू झाली होती. दोन्ही पक्षांकडून नेत्यांची नेमणूक केली होती. या मोर्चाची तयारी पूर्ण झाली होती. ही मराठीची ताकद निर्माण होणार होती त्याचे काय करायचे म्हणून विजयी जल्लोष करावा अशी भूमिका दोन्ही बाजूची आहे. माझे राज ठाकरेंशी बोलणे झाले. त्यावर ते आज भूमिका मांडतील. हा विजयी मेळावा नक्कीच साजरा होईल. या २ प्रमुख नेत्यांशिवाय जे जे घटक मोर्चात सहभागी होणार होते त्या सगळ्यांसह विजयी मेळावा होईल. ही एकजूट मराठी माणसाची होती. लहान असो मोठा घटक असेल कुणालाही बाजूला ठेवून नव्हे तर सगळ्यांना एकत्रित घेऊन हा विजयी जल्लोष होईल असं संजय राऊत यांनी सांगितले. 

फडणवीसांचा दावा खोटा

त्रिभाषा सूत्र याबाबतचा अहवाल उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच स्वीकारला गेला असं भाजपा नेत्यांकडून सातत्याने सांगितले जात होते. खुद्द फडणवीस यांनीही हेच म्हटलं. त्यावर संजय राऊतांनी पलटवार केला. भाजपाच्या राष्ट्रीय धोरणानुसार देवेंद्र फडणवीस खोटे बोलतायेत. दिल्लीत मोदी-शाह खोटे बोलतात तसं राज्यात फडणवीस खोटे बोलतात. माशेलकर अहवाल काय आहे हा टेबलावर ठेवा. हवेत तीर मारू नका. नरेंद्र जाधव अभ्यासगट का स्थापन करताय, एखादा विषय समोर आल्यावर मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ इतर तज्ज्ञांची मदत घेऊन निर्णय घेते. त्यासाठी समिती स्थापन केली जाते असं त्यांनी सांगितले. 

Web Title: Hindi Compulsion Issue: "The government retreated before the power of the Raj and Uddhav Thackeray brothers; this is the first step towards victory, Sanjay Raut Target Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.