आता खाकीला हेल्मेट सक्ती; नियम मोडल्यास कारवाईसह थेट सेवापुस्तिकेत होणार नोंद
By सुमित डोळे | Updated: April 11, 2026 16:17 IST2026-04-11T16:15:35+5:302026-04-11T16:17:26+5:30
पोलिस महासंचालक सदानंद दाते यांचे राज्यातील सर्व पोलिसांसाठी आदेश, परिपत्रक जारी

आता खाकीला हेल्मेट सक्ती; नियम मोडल्यास कारवाईसह थेट सेवापुस्तिकेत होणार नोंद
छत्रपती संभाजीनगर : राज्यात मुंबई व नागपूर वगळता अन्य शहरांमध्ये २० टक्क्यांपेक्षाही कमी पोलिस अधिकारी व अंमलदार हेल्मेट परिधान करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नागरिकांपूर्वी पोलिसांनी हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करावी, असे नमूद करत राज्यातील सर्व पोलिस अधिकारी व अंमलदारांना हेल्मेट बंधनकारक करण्यात आले आहे. हेल्मेट न घातल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करून कायद्याचा भंग केल्याची नोंद त्यांच्या सेवापुस्तिकेत करण्यात येणार असल्याचे आदेश राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी दिले आहेत.
राज्यात गेल्या दहा वर्षांत प्राणघातक व गंभीर अपघातांपैकी सुमारे ४० टक्के अपघात दुचाकीस्वारांशी संबंधित असल्याचे पोलिसांच्या पाहणीत आढळले आहे. कायद्यानुसार दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्तीचे असतानाही नागरिकांकडून त्याला विरोध होतो. दि. ३ एप्रिल रोजी नागपूर पोलिस आयुक्तालयात झालेल्या बैठकीत महासंचालक दाते यांनी याबाबत निरीक्षण नोंदवले. पोलिसांच्या माहितीनुसार, केवळ मुंबई व नागपूर येथेच ८० टक्क्यांहून अधिक नागरिक हेल्मेट वापरतात. अन्य शहरे व जिल्ह्यांत ही संख्या २० टक्क्यांपेक्षाही कमी असून, त्यात पोलिसांचाही समावेश असल्याचे दिसून आले आहे. महासंचालक दाते यांच्या आदेशानंतर राज्याच्या वाहतूक विभागाचे अपर पोलिस महासंचालक प्रवीण साळुंखे यांनी सर्व पोलिस अधिकारी व अंमलदारांसाठी हेल्मेट सक्तीबाबत परिपत्रक जारी केले.
तर सर्व्हिसबुकमध्ये होणार नोंद
वाहतूक कायदा कलम १९४ डी अन्वये प्रत्येक दुचाकीचालकाला हेल्मेट बंधनकारक आहे. महासंचालकांच्या आदेशानुसार आता राज्यातील सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या कायद्यानुसार दुचाकी चालवताना हेल्मेट अनिवार्य असेल.
-दंडात्मक कारवाई : विनाहेल्मेट आढळणाऱ्या पोलिसांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंड वसूल होईल.
-सेवापुस्तिकेत नोंद : नियम मोडणाऱ्या पोलिसाने जाणूनबुजून कायद्याचा भंग केला आहे, असे समजून तशी अधिकृत नोंद त्यांच्या सेवापुस्तिकेत (सर्व्हिस बुक) हाेईल. यामुळे भविष्यात संबंधित कर्मचाऱ्याच्या पदोन्नतीवर किंवा सन्मानचिन्हांवर परिणाम होऊ शकतो.
-सोशल मीडियाचा आधार : जर एखाद्या पोलीस कर्मचाऱ्याचा विनाहेल्मेट दुचाकी चालवतानाचा फोटो सोशल मीडियावर प्रसारित झाला, तरीही ही कारवाई केली जाईल.
२०२५ मध्ये ५ हजार ६४८ जणांचा मृत्यू
केंद्र व राज्य सरकारच्या माहितीनुसार, २०२४ मध्ये ५ हजार ८१४ अपघातांमध्ये ३ हजार १६९ जणांचा मृत्यू झाला, तर २०२५ मध्ये ५ हजार ६४८ अपघातांमध्ये ३ हजार ९० जणांचा मृत्यू झाला. जानेवारी २०२६ मध्ये ५२५ अपघातांत २८४ जणांनी प्राण गमावले. यातील ४० टक्के अपघाती मृत्यू हे दुचाकीचालकांचे झाल्याचे पोलिसांनी सांगितले.