"बिबट्यांना पाळीव प्राण्यांचा दर्जा द्या", आमदार रवी राणा यांची अजब मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 16:51 IST2025-12-11T16:47:30+5:302025-12-11T16:51:00+5:30
Maharashtra Assembly Winter Session 2025: बिबट्यांचा प्रश्न सध्या नागपूरमध्ये सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही गाजत आहे. त्यातच आता राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपाचे समर्थक आमदार रवी राणा यांनी एक अजब मागणी केली आहे. बिबट्यांना पाळीव प्राण्याचा दर्जा द्या अशी मागणी रवी राणा यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली आहे.

"बिबट्यांना पाळीव प्राण्यांचा दर्जा द्या", आमदार रवी राणा यांची अजब मागणी
सध्या राज्यातील विविध भागात बिबट्यांनी उच्छाद घातला आहे. हे बिबटे शेतात, मानवी वस्तीत अगदी शहरी भागातील वसाहतींमधून मुक्त संचार करू लागले आहेत. तसेच या बिबट्यांनी केलेल्या हल्ल्यात अनेकांचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या बिबट्यांचा प्रश्न सध्या नागपूरमध्ये सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही गाजत आहे. त्यातच आता राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपाचे समर्थक आमदार रवी राणा यांनी एक अजब मागणी केली आहे. बिबट्यांना पाळीव प्राण्याचा दर्जा द्या अशी मागणी रवी राणा यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली आहे.
याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना रवी राणा म्हणाले की, आज विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बिबट्यांचा प्रश्न निर्माण झालेला आहे. सध्या सुरू असलेल्या अधिवेशनामध्येही बिबट्याचाच विषय प्रामुख्याने चर्चिला जात आहे. प्रसारमाध्यमांमध्येही बिबट्याचाच विषय दिसून येत आहे. अमरावतीमध्येसुद्धा बिबट्यांचा वावर आहे. नागपूर असो, मुंबई असो शहरी भागात ज्याप्रमाणे बिबटे येत आहेत ते पाहता आता बिबट्यांना पाळीव प्राण्यांचा दर्जा दिला पाहिजे. यासंदर्भात मी स्वत: आज वनमंत्री गणेश नाईक यांनी भेट घेतली. तसेच बिबट्याला पाळीव प्राण्याचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवा, अशी मागणी मी केली. तसेच ज्याप्रमाणे बाबा आमटे यांनी त्यांच्याकडील वनांमध्ये बिबटे पाळले, अनेक ठिकाणी खाजगी वनांमध्ये बिबट्यांचं पालन पोषण सुरू आहे. वनताराच्या माध्यमातून अंबानी परिवाराने अनेक वन्यप्राण्यांना संरक्षण दिलं आहे. आज तुम्ही अनेक घरात पाहिलं तर तिथे खतरनाक जातीचे कुत्रे पाळले जात आहेत. त्यापेक्षा जर आपण बिबट्यांचं लहानपणापासून पालन केलं, तर बिबटेसुद्धा सुरक्षित राहतील आणि माणसंसुद्धा सुरक्षित राहतील आणि मोठ्या प्रमाणावर नसबंदी करावयाची आवश्यकता भासणार नाही, असा प्रकारचा सल्ला मी वनमंत्री गणेश नाईक यांना दिला आहे.
रवी राणा पुढे म्हणाले की, प्रत्येक जिल्ह्यामध्ये वनतारासारखं संग्रहालय सुरू केलं पाहिजे. याबाबत आपण अंबानी कुटुंबालाही विनंती करू. तसेच ज्या प्रमाणे तुम्ही गुजरातमध्ये वनतारा विकसित केलं. तसं महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये वनतारा विकसित करा. त्याठिकाणी सर्व प्राम्यांना सुरक्षित ठेवा. त्यांना संरक्षण द्या. तसेच महाराष्ट्रात अशा प्रकल्पासाठी आणखीही उद्योगपती पुढे येत असतील तर त्यांना सरळ मान्यता द्या. प्रत्येक जिल्ह्यात वनतारा झालं पाहिजे आणि त्यात बिबटे सुरक्षित राहिले पाहिजेत. जर या पद्धतीने बिबट्यांना पाळण्याची परवानगी मिळाली तर सर्वात आधी दोन बिबटे हे रवी राणा पोसायला तयार आहे. एक आमदार म्हणून त्यांचं संपूर्ण पालनपोषण करण्यास रवी राणा तयार आहे. त्यामुळे बिबट्यांना पाळीव प्राण्यांचा दर्जा द्या आणि तसेच जे जे उत्सूक आहेत, त्यांना बिबट्यांचं पालन पोषण करू शकतात त्यांना मान्यता द्या, असेही रवी राणा म्हणाले.
अंबानी कुटुंबीयांना ज्याप्रमाणे कोल्हापूरमधील हत्तीणीला वनतारामध्ये नेऊन सुरक्षित ठेवलं होतं. त्याच पद्धतीनं आपल्या महाराष्ट्रामध्ये जे बिबटे शहरात येत आहेत. मी अंबानी कुटुंबाला, तसेच अदानी कुटुंबाला आणि जेवढे उद्योगपती आहेत त्यांना विनंती करतो की, त्यांनी वनतारासारखं संग्रहालय प्रत्येक तालुक्यामध्ये सुरू केलं. स्वत: पुढे आले तर सरकारने स्वत:हून त्यांना मदत केली पाहिजे. त्यांना मान्यता दिली पाहिजे. तसेच उद्योगपतींच्या माध्यमातून वनतारासारखी मोठी संग्रहालये सुरू केली पाहिजेत, अशी मी सरकारला विनंती करतो, असेही रवी राणा यांनी सांगितले.