Raj Thackeray Uddhav Thackeray Maharashtra: "उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या जवळच्या माणसांपासून सावध राहिले पाहिजे आणि त्यांनी राज ठाकरेंना जवळ ठेवले पाहिजे", असा सल्ला देत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, तर बाळासाहेबांना ती खरी श्रद्धांजली ठरेल, असे विधान केले. मुंबईत माध्यमांशी बोलताना उद्धव-राज एकत्र येण्याबद्दल त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गजानन कीर्तिकर म्हणाले, "उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊ शकतात. आश्चर्य काही नाही. बाळासाहेब प्रयत्न करत होते. त्यांच्या हयातीमध्ये ते झालं नाही. ती खंत घेऊन ते गेले. आम्ही सुद्धा शिवसेनेतील जुनी माणसं. आमची पण ती इच्छा आहे. आम्हालाही ते वाटतं. कारण शिवसेनेचे तुकडे बघून आम्हाला खूप त्रास होतो", अशी व्यथा गजानन कीर्तिकर यांनी मांडली.
बाळासाहेबांना ही खरी श्रद्धांजली ठरेल
"ज्या शिवसेनेचे बाळासाहेब नेतृत्व करत होते. ती शिवसेना अशी दुभंगलेली बघून दुःख होतं. शिवसैनिकांना पण फार त्रास होतो. त्यांचे राजकीय भवितव्य कोलमडून गेलेलं आहे. त्यामुळे त्यांनी एकत्र यावे, ही गरज आहे. बाळासाहेबांना या दोन्ही बंधूंनी दिलेली खरी श्रद्धांजली ठरेल. आमच्यासारखे जे नेते आहेत वयोवृद्ध झालेले त्यांचा आशीर्वाद मिळेल त्यांना (राज ठाकरे-उद्धव ठाकरे)", अशा भावना गजानन कीर्तिकर यांनी व्यक्त केल्या.
उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसारखी कार्यपद्धती ठेवावी -कीर्तिकर
"राज ठाकरे दूर गेल्याची कारणे अनेक आहेत. उद्धव आता मोठे बंधू आहेत. बाळासाहेबांच्यानंतर शिवसेनेचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे आणि एकत्र आणलं पाहिजे. बाळासाहेबांची सर्वांना सामावून घेण्याची कार्यपद्धती होती. कुणालाही नाराज न करण्याची. ज्याचं चुकलं असेल, त्याला समज देणं. अशी कार्यपद्धती उद्धवजींनी ठेवली पाहिजे", असा वडिलकीचा सल्ला गजानन कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरेंना दिला.
वाचा >>राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
"त्यांनी जी जवळ केलेली माणसं आहेत, त्यांच्यापासून सावध राहिले पाहिजे. त्यांचे जे गैरसल्ले असतात. त्यामुळे कार्यपद्धतीत अडचणी निर्माण होतात. ते त्यांनी सांभाळलं पाहिजे. राज ठाकरेंमध्ये राजकारणात चांगल्या पद्धतीने काम करण्याची कुवत आहे. त्यांना जवळ ठेवलं पाहिजे. त्यांचे बंधू आहेत. आम्हाला वाटतं दोघांबद्दल", असेही गजानन कीर्तिकर म्हणाले.
तिघे एकत्र आले, तर पुन्हा वैभव मिळेल
"उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आले, तर शिवसेना भक्कम होईल. शत प्रतिशत स्वबळावर राज्य करण्याची इच्छा ज्यांना कुणाला झालेली आहे, त्यांची ती इच्छा पूर्ण होणार नाही, जर हे तिघे एकत्र आले तर. पुन्हा ते वैभव मिळेल. एकत्र येऊन तर बघावं", असे म्हणत गजानन कीर्तिकर यांनी भाजपवरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.