चारही स्तंभ मजबूत झाल्यावर लोकशाही समृद्ध

By admin | Published: April 21, 2017 11:58 PM2017-04-21T23:58:01+5:302017-04-21T23:59:45+5:30

लोकशाहीचे चारही स्तंभ मजबूत केले जात नाहीत; तोपर्यंत लोकशाही समृद्ध होणार नाही. सरकार म्हणून पत्रकार हल्लाविरोधी कायदा मंजूर करणे हे आमचे कर्तव्य होते.

The four pillars strengthen the democracy and prosper | चारही स्तंभ मजबूत झाल्यावर लोकशाही समृद्ध

चारही स्तंभ मजबूत झाल्यावर लोकशाही समृद्ध

Next

पुणे : लोकशाहीचे चारही स्तंभ मजबूत केले जात नाहीत; तोपर्यंत लोकशाही समृद्ध होणार नाही. सरकार म्हणून पत्रकार हल्लाविरोधी कायदा मंजूर करणे हे आमचे कर्तव्य होते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केले. स्वामी विवेकानंद यांच्यानंतर श्री श्री रविशंकर यांनी जगभरात अध्यात्माचा विचार व सत्याचा मार्ग अधिक प्रकटपणे मांडला, असे गौरवोद्गारही फडणवीस यांनी काढले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रणेते योगगुरू श्री श्री रविशंकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच पत्रकार हल्लाविरोधी कायदा मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचा ‘लोकमत’चे समूह संपादक दिनकर रायकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी फडणवीस बोलत होते. पुण्याचे पालक मंत्री गिरीश बापट, आॅल जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक वानखेडे, ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर, राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष राजा माने, राज्य संघटक संजय भोकरे, सरचिटणीस गोविंद घोळवे, जिल्हाध्यक्ष किरण जोशी, वसंत मुंडे, मंदार फणसे आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, ‘‘कर्जमाफी हा शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा मार्ग असू शकतो. मात्र, कर्जमाफी दिल्यानंतर शेतकरी पुन्हा कर्जबाजारी झाला तर आपण करंटे ठरू. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी देणे, शेतीमालाला योग्य भाव देणे, उत्पादन खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करणे आदी गोष्टी करण्याची आवश्यकता आहे.’’
बापट म्हणाले, ‘‘पत्रकारांवरील हल्ला हा लोकशाहीवरील हल्ला आहे. पत्रकार समर्पक भावनेतून काम करतात. त्यांना काम करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी पत्रकार हल्ला विरोधी कायदा मंजूर करण्यात आला.’’
सत्काराला उत्तर देताना श्री श्री रविशंकर यांनी पत्रकार, उद्योजक, धर्मगुरू आणि राजकीय नेते यांनी एकत्रिपणे काम केले तर समाजाचा विकास गतीने होईल, असे सांगितले. शेतकऱ्यांमधील निराशेचे वातावरण दूर करण्यासाठी ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’च्या माध्यमातून प्रयत्न केले जातील, अशी ग्वाहीदेखील दिली.
रायकर म्हणाले, ‘‘पत्रकारांना संरक्षण मिळावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून मागणी केली जात होती. विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यास पाठिंबा दिला. सत्तेत आल्यानंतर त्यांनी कायदा मंजूर केला. तसेच जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न सोडवण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांचे अभिनंदन.’’
वानखेडे यांनी मनोगत व्यक्त केले. राज्य मराठी संघाला शासकीय मान्यता देण्यात यावी, अशी मागणी प्रास्ताविकात संजय भोकरे यांनी केली. राजा माने यांनी स्वागत केले. (प्रतिनिधी)

Web Title: The four pillars strengthen the democracy and prosper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.