Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 10:54 IST2025-06-17T10:50:43+5:302025-06-17T10:54:54+5:30
जिल्हा प्रशासनाने पालकांचे समुपदेशन करून गरज पडल्यास थोडी जोर जबरदस्ती करून ती मुले शाळेत गेलीच पाहिजेत, अशी भूमिका घ्यायला हवी, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केले.

Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
हितेन नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर: सर्वत्र शाळा प्रवेशोत्सव होत आहेत, मात्र माझ्यासमोर चिंता आहे ती स्थलांतरित कातकरी कुटुंबातील शाळाबाह्य मुलांची. स्थलांतर करणारी जी आमची मुले आहेत, त्यांचे शिक्षण हे मोठे चॅलेंज आहे. आम्ही मोठ्या प्रमाणात शाळाही सुरू केल्या असून, जिल्हा प्रशासनाने पालकांचे समुपदेशन करून गरज पडल्यास थोडी जोर जबरदस्ती करून ती मुले शाळेत गेलीच पाहिजेत, अशी भूमिका घ्यायला हवी, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील आदिवासी समाजाच्या जीवनामध्ये मूलभूत परिवर्तन करण्यासाठी सुरू केलेली ‘धरती आबा’ लोकसहभाग मोहिमेचा शुभारंभ पालघर जिल्ह्यात मनोर येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास पालकमंत्री गणेश नाईक, कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, आदिवासी क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित, राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड, पोलिस अधीक्षक यतिश देशमुख उपस्थित होते.
वाढवणमधील रोजगारात स्थानिकांना प्राधान्य देणार
पालघरमध्ये वाढवण बंदर उभे राहिल्यानंतर जिल्ह्यात विकासात्मक परिवर्तन होणार आहे. बंदरामुळे देश भविष्यात सागरी शक्ती म्हणून पुढे येणार आहे. यामुळे जागतिक व्यापारात भारताची भागीदारी वाढेल. स्थानिक तरुणांना येथील रोजगारात प्राधान्य देणार असल्याचे फडणवीस म्हणाले.
वनपट्टे १५ ऑगस्टपर्यंत निकाली काढा
जिल्ह्यात आजही ७ ते ८ हजार वनपट्टे वाटप करण्याचे काम शिल्लक आहे. हे वनपट्टे १५ ऑगस्टपर्यंत निकाली काढण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सुसंवाद ही समृद्ध शिक्षणव्यवस्थेची किल्ली
सोमवारी विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव सोहळा पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर तालुक्यातील दुर्वेस शाळेत सोमवारी उपस्थित राहून येथील विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तक वाटप करून त्यांचे औपचारिक स्वागत केले. गुणवत्तापूर्ण शिक्षण, तंत्रज्ञानाचा वापर आणि शिक्षक-पालक यांच्यातील सुसंवाद हीच भविष्यातील समृद्ध शिक्षणव्यवस्थेची किल्ली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.