अशोक खरातसारख्या भोंदूबाबांना भर चौकात...; कालीचरण महाराज यांनी व्यक्त केला संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 08:37 IST2026-03-22T08:35:52+5:302026-03-22T08:37:42+5:30
स्वयंघोषित कोणताही महाराज नाही. लोकं त्यांना महाराज म्हणतात. कोणताच महाराज म्हणत नाही की मला महाराज म्हणा.

अशोक खरातसारख्या भोंदूबाबांना भर चौकात...; कालीचरण महाराज यांनी व्यक्त केला संताप
लोकमत न्यूज नेटवर्क, धाराशिव: अशोक खरातसारख्या भोंदूंवर आरोप सिद्ध झाले तर त्याला भर चौकात गोळ्या घालाव्यात, अशी प्रतिक्रिया कालीचरण महाराज यांनी येथे दिली. स्वयंघोषित कोणताही महाराज नाही. लोकं त्यांना महाराज म्हणतात. कोणताच महाराज म्हणत नाही की मला महाराज म्हणा. लोकांनी महाराज केलेला आहे. लोकांनी पूजनीय पदावर बसवलं असेल आणि त्या पदावरून दुरुपयोग होत असेल, कुकर्म होत असेल, किंवा धर्म कलंकित केला जात असेल तर ते लोकं महापापी आहेत. जे लोकं अशा कुकर्मात अडकले आहेत, त्यांचे गुन्हे सिद्ध होतात तर त्यांना भर चौकात गोळी मारली पाहिजे, असे कालीचरण महाराज म्हणाले.
‘त्या’ नेत्यांवरही कारवाई करा ; ‘अंनिस’ची मागणी
पुणे : नाशिक येथील भोंदू अशोक खरात प्रकरणाचा भांडाफोड झाल्यानंतर राज्यातील अंधश्रद्धेचे विदारक वास्तव समाेर आले आहे. याची गंभीर दखल घेत सरकारने या प्रकरणाशी संबंधित सर्वच राजकीय नेत्यांवरदेखील कडक कारवाई करावी. याचबरोबर जादूटोणा प्रतिबंध आणि उच्चाटन अधिनियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक नियमावली मंजूर करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने शनिवारी पत्रकार परिषदेत केली.
उद्धव ठाकरेंचे खुले आव्हान
मुंबई : भोंदूबाबा खरातच्या आश्रमाला पाणी देण्याच्या निर्णयाची सरकारने चौकशी करावीच, शिवाय या भोंदूबाबाच्या निमित्ताने कुठेकुठे पाणी मुरले आहे याचीही चौकशी करावी, असे आव्हान तत्कालीन मुख्यमंत्री व उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. मुंबईत पत्रकारांशी बोलताना ठाकरे म्हणाले, जो गुन्हेगार असेल त्याला शिक्षा करा, चौकशी केल्यावर जो गुन्हेगार असेल त्याच्यावर कारवाई मात्र करा, असेही ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
‘खरातला मिरगाव बंदी करा, मंदिराचाही ताबा द्या’
नाशिक : अशोक खरात याच्यामुळे मिरगावाची बदनामी झाल्याचा आरोप करत या भोंदूबाबाला कठोर शिक्षा देण्याची मागणी ग्रामस्थांनी माध्यमांशी बोलताना केली आहे. खरातच्या कृष्णकृत्याविरोधी संताप व्यक्त करतानाच ग्रामस्थांनी खरातवर अतिक्रमणासह गावचा निधी पळविल्याचा व गावातील जमिनी हडप केल्याचा आरोप केला आहे. खरात याला गावबंदी करण्यासह ईशान्येश्वर मंदिराचा ताबा ग्रामस्थांकडे देण्याची मागणी करण्यात आली आहे.