'दादा तुमचा निर्णय चुकला, माघारी या...', अजित पवारांच्या आठवणीत एकनाथ शिंदे भावूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 14:09 IST2026-02-23T14:09:01+5:302026-02-23T14:09:54+5:30
Eknath Shinde Speech on Ajit Pawar: अजित पवारांसारखा नेता गमावणे ही राज्यासाठी भरून न निघणारी हानी आहे.

'दादा तुमचा निर्णय चुकला, माघारी या...', अजित पवारांच्या आठवणीत एकनाथ शिंदे भावूक
Eknath Shinde on Ajit Pawar: राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज(दि.23) सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात शोकाकुल वातावरण होते. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करणाऱ्या शोकप्रस्तावाने अधिवेशनाची सुरुवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा शोकप्रस्ताव मांडला, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
28 जानेवारीने आमचा आधार हिरावून नेला...
एकनाथ शिंदे म्हणाले, मी, देवेंद्रजी आणि अजितदादा हे महाराष्ट्राच्या स्थैर्याचा ‘ट्रँगल ऑफ स्टॅबिलिटी’ होतो. आम्ही तिघे एकत्र आलो म्हणून राज्याची घोडदौड सुरू झाली होती. मात्र, 28 जानेवारीच्या त्या काळ्या दिवसाने आमचा हा आधार हिरावून नेला. अपघाताची दृश्ये टीव्हीवर पाहिल्यानंतर मन सुन्न झाले. दादा म्हणजे स्पष्टवक्तेपणा आणि वक्तशीरपणाचे प्रतीक होते. दादा, तुमचा निर्णय चुकला, माघारी या...अशी भावना शिंदेंनी व्यक्त केली.
प्रशासकीय पकड आणि कामाची शिस्त
अजित पवार यांच्या कार्यशैलीबद्दल बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, अजितदादांची प्रशासनावर जबरदस्त पकड होती. फाईल हातात घेतली की, काही सेकंदांत त्रुटी हेरायचे, साधी वायर लटकलेली किंवा पायरी नीट नसली तरी अधिकाऱ्यांना झापायचे. 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर असून, लाडकी बहीण योजनेसाठी 46 हजार कोटींची तरतूद करताना त्यांनी अर्थकारणाचा समतोल उत्कृष्टपणे राखला होता.
बाहेरून कडक, आतून मृदू
दादा बाहेरून फणसासारखे कडक वाटायचे, पण आतून अत्यंत मृदू मनाचे होते, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या संवेदनशील स्वभावावर प्रकाश टाकला. अजित पवारांसारखा नेता गमावणे ही राज्यासाठी भरून न निघणारी हानी आहे. कोरोना काळात मंत्रालयात जाऊन काम करणे असो, सरकार स्थापनेच्या चर्चेदरम्यान पत्रकार परिषदेत माईक घेऊन केलेले विधान असो किंवा अधिवेशन काळात पूर्णवेळ उपस्थित राहून विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देणे...अजित पवार नसल्याची उणीव प्रकर्षाने जाणवते.