हे नीच राजकारण मी विसरलो नाही, उद्धवला भविष्यात कळेल; राज ठाकरेचं भाषण व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 03:07 PM2022-06-24T15:07:15+5:302022-06-24T15:07:44+5:30

मला पक्ष फोडून माझा पक्ष उभारायचा नाही. या गोष्टी मला करायच्या नाहीत, मी करणारही नाही असं राज ठाकरेंनी म्हटलं होते.

Eknath Shinde Revolt: MNS Raj Thackeray old speech viral about Uddhav Thackeray Politic | हे नीच राजकारण मी विसरलो नाही, उद्धवला भविष्यात कळेल; राज ठाकरेचं भाषण व्हायरल

हे नीच राजकारण मी विसरलो नाही, उद्धवला भविष्यात कळेल; राज ठाकरेचं भाषण व्हायरल

googlenewsNext

मुंबई - मंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या बंडामुळे शिवसेनेत भूकंप आला आहे. शिवसेनेचे जवळपास ३८ हून अधिक आमदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत. एकनाथ शिंदेंच्या बंडाच्या पवित्र्यामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बंडखोर आमदारांना परत येण्याचं आवाहन केले परंतु शिंदे गटाने त्यास नकार देत आधी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार सोडा अशी मागणी केली. 

राज्यातील या सत्तासंघर्षाच्या नाट्यमय घडामोडीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं जुन भाषण व्हायरल झाले आहे. ऑक्टोबर २०१७ मध्ये मुंबईत मनसेचे सात पैकी सहा नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले. शिवसेनेने मनसे फोडली. ही घटना राज ठाकरेंच्या जिव्हारी लागली. तेव्हा वेळ प्रत्येकावर येते असं विधान राज यांनी केले होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज ठाकरेंचे ते भाषण पुन्हा व्हायरल होऊ लागले आहे. 

यात राज ठाकरे(Raj Thackeray) म्हणाले होते की, 'मी शिवसेनेतून ज्या वेळेला बाहेर पडलो, त्यावेळी सुद्धा मी बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो होतो. हे उद्धव वगैरे आहेत ना त्यांच्या या नीच राजकारणाचा मला कंटाळा आला होता, म्हणून मी बाहेर पडलो. मी जेव्हा बाहेर पडलो, तेव्हा शिवसेनेतील अनेक आमदार, नगरसेवक माझ्यासोबत बाहेर पडायला तयार होते, पण तेव्हा मी सांगितलं होतं, की मला पक्ष फोडून माझा पक्ष उभारायचा नाही. या गोष्टी मला करायच्या नाहीत, मी करणारही नाही. पक्ष स्थापनेच्या वेळीही, कोणालाही विचारुन बघा, मी एकालाही फोनही केला नव्हता. त्यानंतर मी बाहेर पडल्यावर जे प्रेमाने येतील, ते माझ्यासोबत राहतील. त्यामुळे असलं घाणेरडं राजकारण मी कधी केलं नाही, करणारही नाही;' असं त्यांनी सांगितले होते. 

त्याचसोबत 'आजपर्यंत या लोकांना मी अनेक वेळा मदत करत आलो. पण हे असलं राजकारण बाळासाहेबांनी कधी शिकवलं नाही. बाळासाहेब जसे वागायचे, त्यांनी जे शिकवलं ते मी आत्मसात केलं आहे, उद्धव आणि त्याच्या सहकाऱ्यांकडून अत्यंत नीच अशी खेळी खेळली गेली. महाराष्ट्रातील जनता हे विसरणार नाही आणि मी हे कधीच विसरणार नाही. आणि मी विसरलेलो नाही, हे त्यांना भविष्यात कळेल' असेही राज ठाकरे म्हणाले होते. शिवसेनेवर आज जी वेळ आलीय त्यावरून सोशल मीडियात राज ठाकरेंच्या जुन्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

Web Title: Eknath Shinde Revolt: MNS Raj Thackeray old speech viral about Uddhav Thackeray Politic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.