राज्यात दिवसभरात काेराेनाचे ४,७८७ नवे रुग्ण, ४० मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 01:53 IST2021-02-18T01:53:30+5:302021-02-18T01:53:47+5:30
CoronaVirus in Maharashtra : राज्यात ३८,०१३ हजार रुग्ण उपचाराधीन आहेत. दिवसभरात ३,८५३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण १९,८५,२६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात दिवसभरात काेराेनाचे ४,७८७ नवे रुग्ण, ४० मृत्यू
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून पुढच्या टप्प्यात सर्वत्र वर्दळ वाढल्यानंतर कोरोनाचा फैलाव होताना दिसत आहे. राज्यात बुधवारी ४,७८७ नवीन रुग्णांचे निदान आणि ४० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २०,७६,०९३ झाली असून बळींचा आकडा ५१ हजार ६३१ झाला आहे.
राज्यात ३८,०१३ हजार रुग्ण उपचाराधीन आहेत. दिवसभरात ३,८५३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण १९,८५,२६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६२ टक्के झाले आहे. आज राज्यातील मृत्युदर २.४९ टक्के एवढा आहे.