मोबाइलवर अलर्टही नाही, वाहनातच झोपण्याची वेळ; लेखकाने सांगितला वाहतूककोंडीतील धक्कादायक अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 09:36 IST2026-02-06T09:35:39+5:302026-02-06T09:36:11+5:30
Mumbai-Pune Expressway Story: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अडकलेल्या लाखो प्रवाशांपैकी एक म्हणजे लेखक नितीन साळुंखे. पुण्याहून मुंबईकडे निघालेल्या साळुंखेंना आपल्या घरी पोहोचायला तब्बल २३ तास लागले! त्यांनी मांडलेलं वास्तव यंत्रणेचे डोळे उघडणारं आहे.

मोबाइलवर अलर्टही नाही, वाहनातच झोपण्याची वेळ; लेखकाने सांगितला वाहतूककोंडीतील धक्कादायक अनुभव
खलील गिरकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: लोणावळ्याजवळ टँकर उलटल्यानंतर मुंबई- पुणे द्रुतगती महामार्ग तब्बल ३३ तासांहून अधिक काळ बंद राहिल्याने लाखो प्रवाशांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. लेखक नितीन साळुंखे, अशोक राणे आणि श्रीनिवास नार्वेकर पुण्याहून मुंबईकडे येत असताना या कोंडीत अडकले. ते रात्री ०८:०० वाजता पुण्याहून निघाले होते. मात्र, तब्बल तेवीस तास प्रवासात अडकल्यानंतर दुसऱ्या दिवशी सायंकाळी ०७:०० वाजता ते मुंबईत पोहोचले. विशेष म्हणजे त्यासाठीही त्यांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागला.
साळुंखे यांनी सांगितले, ‘अपघात झाल्याचे कळताच आणि रसायन धोकादायक असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीस व प्रशासनाने दोन्ही बाजूंच्या टोलनाक्यांवर सूचना देणे गरजेचे होते. अत्यावश्यक प्रवास करणाऱ्यांनाच परवानगी देणे अपेक्षित होते. मात्र, माहिती न दिल्यामुळे वाहनांची संख्या वाढत गेली. त्यानंतर काही प्रवाशांनी हॉटेलमध्ये आसरा घेतला.
मोबाइलवर अलर्टही नाही
विकसित भारत आणि डिजिटल इंडियाचे दावे करताना, अशा संकटाच्या वेळी साधा मोबाइल अलर्टही पाठवण्यात आला नाही. जर वेळेवर सूचना दिली असती, तर अनेकांचा त्रास टाळता आला असता, असे साळुंखे म्हणाले.
वाहनातच झोपण्याची वेळ
अनेकांना हॉटेलमध्ये जागा मिळाली नाही. त्यामुळे वाहनातच झोपावे लागले. महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना अन्नपाणी मिळण्यात अडचणी आल्या. महामार्गावर प्रशासनाचा किंवा पोलिसांचा एकही कर्मचारी मदतीसाठी दिसला नाही. पर्यायी मार्गांची माहिती देण्यात आली नाही, मदत केंद्रे उभारली गेली नाहीत, अडकलेल्या प्रवाशांसाठी पाणी किंवा वैद्यकीय मदतही उपलब्ध करून देण्यात आली नाही, असे साळुंखे म्हणाले.