देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना धक्का; दादांनी घेतलेला निर्णय ८ दिवसांत बदलला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 01:55 PM2023-08-30T13:55:22+5:302023-08-30T13:56:52+5:30
अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयामुळे अनेक भाजपा नेते अडचणीत आले होते.
![Devendra Fadnavis changed Ajit Pawar's decision regarding sugar factory loan after BJP leaders complained | देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना धक्का; दादांनी घेतलेला निर्णय ८ दिवसांत बदलला Devendra Fadnavis changed Ajit Pawar's decision regarding sugar factory loan after BJP leaders complained | देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना धक्का; दादांनी घेतलेला निर्णय ८ दिवसांत बदलला](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/deva-bhau-ajit-dapzce_2023081076456.jpg)
देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना धक्का; दादांनी घेतलेला निर्णय ८ दिवसांत बदलला
मुंबई – महायुतीच्या राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि २ उपमुख्यमंत्री आहेत. त्यातील एका उपमुख्यमंत्र्यांनी म्हणजेच अजित पवारांनी घेतलेला निर्णय हा दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी बदलला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना धक्का दिला अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या निर्णयावरून विरोधकांनीही देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.
एनसीडीसीने मंजूर केलेले ५४९ कोटींचे कर्ज हवे असल्यास कारखान्याच्या संचालकांनी वैयक्तिक आणि सामुहिक जबाबदारीचं हमीपत्र द्यावे. कारखान्याच्या जागेवर सातबाराचा बोजा चढवावा तसेच ग्राहक खत दस्तावेजावर हस्ताक्षराचे अधिकार सरकारला द्यावेत असे निर्बंध उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लावले होते. या निर्णयामुळे कारखानदारांची कोंडी झाली होती. त्याचसोबत अनेक कारखानदार असलेले भाजपा नेतेही अडचणीत आले होते. मात्र अजित पवारांचा साखर कारखान्याबाबतचा निर्णय अजित पवारांनी ८ दिवसांत मागे घेतलाय.
काय होत्या अटी?
- कर्ज वसुली न झाल्यास कारखान्याच्या मालमत्तेच्या विक्रीतून कर्जाची वसुली
- संचालक मंडळाचा ठराव देणाऱ्या कारखान्यांनाच कर्ज मिळेल
- कारखान्याच्या संचालकांनी वैयक्तिक आणि सामुहिक जबाबदारीचं हमीपत्र द्यावे
- कारखान्याच्या जागेवर सातबाराचा बोजा चढवावा
- ग्राहक खत दस्तावेजावर हस्ताक्षराचे अधिकार सरकारला द्यावेत
‘या’भाजपा नेत्यांना मिळाला दिलासा
- विजयसिंह मोहिते पाटील, माजी उपमुख्यमंत्री – शंकर सहकारी साखर कारखाना – ११३.४२ कोटी
- हर्षवर्धन पाटील, माजी सहकारमंत्री – शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना – १५० कोटी
- अभिमन्यू पवार, भाजपा आमदार – शेतकरी सहकारी साखर कारखाना – ५० कोटी
- रावसाहेब दानवे – केंद्रीय राज्यमंत्री – रामेश्वर सहकारी साखर कारखाना – ३४.७४ कोटी
- धनंजय महाडिक – भाजपा खासदार – भीमा सहकारी साखर कारखाना – १२६.३८ कोटी
विरोधकांनी सरकारवर साधला निशाणा
अजित पवारांनी घेतलेला निर्णय भाजपा नेत्यांना अडचणीचा वाटल्याने त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली. अजितदादांनी घेतलेला निर्णय हा फडणवीसांनी रद्द केला. दादांवर भाऊ भारी पडतोय. दादा-भाऊमध्ये पुणे, नागपूरमध्ये ठाणे कुठेच दिसत नाही, ठाणे गायब झालेले दिसते असं सांगत विधानसभेचे विरोधी पक्षनेते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.