“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 07:16 IST2025-11-06T07:14:45+5:302025-11-06T07:16:39+5:30
Deputy CM Eknath Shinde News: कांदिवलीतील पोइसर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला बिहारी नागरिकांशी संवाद

“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
Deputy CM Eknath Shinde News: बिहारमध्ये एकेकाळी असलेले जंगलराज संपुष्टात आणून तेथे एनडीएचे सरकार आले. त्यामुळे तेथील जनतेला पुन्हा जंगलराज नको असून, विकासाच्या मुद्द्यावर मतदार मतदान करतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. मुंबईच्या कांदिवलीत पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठी मदत केली. त्यामुळे राज्यात दुहेरी इंजिन सरकार आले आहे. देशात विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे, असे शिंदे म्हणाले. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होत असून, दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक ११ तारखेला होणार आहे. जनता पुन्हा एनडीएसोबत उभी राहील. गुंडागर्दी आणि जंगलराज नको म्हणून जनता विकासाची निवड करीत आहे, असे एकनाथ शिंदेंनी नमूद केले.
राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी राहुल गांधींचे बेछूट आरोप
राहुल गांधी यांच्यावर घणाघात करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, राहुल गांधी राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी बेछूट आरोप करत आहेत. मोदी सरकारवर मतचोरीचा आरोप करणाऱ्यांनी आधी नोटचोरी केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासाठी नेशन फर्स्ट, तर विरोधकांसाठी करप्शन फर्स्ट आहे. बिहारची जनता विरोधकांना धडा शिकवून एनडीएला पुन्हा सत्ता देईल, असा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला. लवकरच बिहार निवडणुकीमध्ये एनडीएच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी मी स्वतः बिहारला जाणार असून, संजय निरुपम यांनाही सोबत घेऊन जाणार असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.
दरम्यान, पोईसर येथे गेली ५० वर्षे लोकं झोपडपट्टीत राहत असून क्लस्टर पुनर्विकास योजना राबवून सर्वांना हक्काचे घर मिळावे यासाठी शासन नक्की प्रयत्न करेल. तसेच पोईसर नदी शुद्धिकरणासाठी इथे एसटीपी कार्यान्वित करण्यात येईल. मी मुख्यमंत्री असताना मुंबईत डीप क्लीन ड्राइव्ह मोहीम राबवून रस्ते स्वच्छ करण्याचा प्रयत्न मी केला होता, पावसाने उघडीप दिल्यानंतर पोईसर परिसरातून या मोहिमेला पुन्हा एकदा सुरुवात करू असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम आणि शिवसेनेचे उत्तर भारतीय आघाडीतील सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.