‘एसआयटी’ला २७ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ, विषबाधित शेतक-यांचे मृत्यू प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 16:49 IST2017-11-16T16:49:05+5:302017-11-16T16:49:23+5:30
पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना यवतमाळ जिल्ह्यात दोन महिन्यांत ५०० वर शेतक-यांना विषबाधा होऊन २० शेतकरी, शेतमजुरांचा मृत्यू झाला. या प्रकाराची गंभीर दखल घेत प्रकरणाच्या तपासासाठी शासनाने १३ आॅक्टोबरला विशेष तपास पथकाची (एसआयटी)ची स्थापना केली.

‘एसआयटी’ला २७ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ, विषबाधित शेतक-यांचे मृत्यू प्रकरण
- गजानन मोहोड
अमरावती : पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना यवतमाळ जिल्ह्यात दोन महिन्यांत ५०० वर शेतक-यांना विषबाधा होऊन २० शेतकरी, शेतमजुरांचा मृत्यू झाला. या प्रकाराची गंभीर दखल घेत प्रकरणाच्या तपासासाठी शासनाने १३ आॅक्टोबरला विशेष तपास पथकाची (एसआयटी)ची स्थापना केली. या समितीला तीन आठवड्यांच्या आत शासनाला अहवाल सादर करायचा होता, मात्र या अवधीत तपास व अहवाल न आल्याने एसआयटीला २७ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
ही तपास समिती मानवनिर्मित आपत्ती घडण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या बाबी निश्चित करून त्याबाबत प्रतिबंधात्मक शिफारशी देणार आहे. यामध्ये कायद्यात तरतुदीची अंमलबजावणी करताना घडलेल्या चुका त्याकरिता जबाबदार व्यक्ती, संस्था व शासकीय, निमशासकीय अधिकारी व कर्मचारी निश्चित करणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात बिगरपरवाना कीटकनाशकाचे विक्री प्रकरणी करण्यात आलेली कार्यवाही तसेच कीटकनाशकांचे नमुने अप्रमाणित आढळलेल्या प्रकरणांमध्ये केलेल्या कार्यवाहीचे गुणात्मक विश्लेषण करून शासनाला शिफारशी देणार आहे.
सध्या विक्री असलेले काही कीटकनाशके, स्प्रे पंप इत्यादीच्या विक्रीवर प्रतिबंध घालणे आवश्यक असल्यास त्याबाबत शासनच शिफारशी करणार आहेत. यवतमाळ जिल्ह्यात या प्रकारच्या घटनांबाबत अहवाल देण्याच्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार शासनांच्या प्रशासकीय विभागांना अहवाल सादर न करण्यासंदर्भात झालेल्या उणिवा शोधून काढणार आहे व त्यासाठी जबाबदार असणाºया विभागाची माहीती निश्चित करणार आहे. या दुर्घटनेबाबत जिल्हा नियंत्रण कक्षाद्वारे करण्यात आलेले संनियंत्रण, देखरेख तसेच घटनेनंतरभविष्यात पुनरावृत्ती होऊ नये, याकरिता तातडीने करावयाच्या कार्यवाहीबाबत शासनाला तीन आठवड्यांत शिफारशी करणार आहे. दरम्यान एसआयटीच्या नियमित बैठकी होत असून कीटकनाशकांच्या फवारणीमुळे विषबाधित कुटुंबीयांची त्यांनी भेट घेतली व आरोग्य विभागाचाही आढावा घेतला.
विशेष तपास पथकात या सदस्यांचा समावेश
शासनाने स्थापित केलेल्या विशेष पथकाचे प्रमुख विभागीय आयुक्त पीयुष सिंग, तर विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे सचिव आहेत. या पथकामध्ये अमरावतीचे विशेष पोलीस महासंचालक सी.एच वाकडे, आरोग्य उपसंचालक डॉ. नितीन नाईकवाडे, अकोला कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्र विभागप्रमुख डॉ. डी.बी.उंदीरवाडे, नागपूरच्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक विजय वाघमारे, के.डब्ल्यु. देशकर व फरिदाबाद येतील डायरेक्टोरेट आॅफ प्लांट प्रोटेक्शन, क्वारेनटाईन अँड स्टोरेज हे सदस्य आहेत.