‘द केरल स्टोरी’बाबत जितेंद्र आव्हाडांचे विधान; देवेंद्र फडणवीस म्हणाले, “...तर कारवाई करणार”
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 22:28 IST2023-05-09T22:24:17+5:302023-05-09T22:28:15+5:30
Devendra Fadnavis News: एका विशिष्ट समाजाचे लांगुलचालन करण्यासाठी ते अशाप्रकारे बोलतात, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

‘द केरल स्टोरी’बाबत जितेंद्र आव्हाडांचे विधान; देवेंद्र फडणवीस म्हणाले, “...तर कारवाई करणार”
Devendra Fadnavis News: आताच्या घडीला ‘द केरल स्टोरी’ चित्रपटावरून देशातील वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. काही जण या चित्रपटाचे समर्थन करत असून, काही जण या चित्रपटाविरोधात सूर आळवत आहेत. पश्चिम बंगालमध्ये तर या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. राज्यातील नेते मंडळींकडूनही या चित्रपटासंदर्भात प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विधानावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
‘द केरल स्टोरी’ चित्रपटाच्या नावाखाली एका राज्याची आणि तेथील महिलांची बदनामी करण्यात आली आहे. धर्मांतर करून इसिस संघटनेत गेलेल्या महिलांचा अधिकृत आकडा तीन आहे, तरीही चित्रपटात हा आकडा ३२ हजार इतका दाखवला आहे. ज्याने या चित्रपटाची निर्मिती केली आहे, त्याला सार्वजनिकरित्या फासावर लटकवले पाहिजे, असे खळबळजनक विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
जितेंद्र आव्हाड असे बोलले असतील, तर ते अतिशय चुकीचे आहे
मीडियाशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात प्रतिक्रिया विचारण्यात आली. जितेंद्र आव्हाड जर असे बोलले असतील, तर ते अतिशय चुकीचे आहे. अशाप्रकारे बोलणे हे बेकायदेशीर आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि एका विशिष्ट समाजाचे लांगुलचालन करण्यासाठी ते अशाप्रकारे बोलतात. पण यामुळे इतर समाजात त्यांच्याबद्दल प्रचंड रोष आहे, विशेषत: हिंदू समाजात… हे जितेंद्र आव्हाडांना कळत नाही. त्याचे वक्तव्य तपासून पाहिले जाईल, त्यांच्या वक्तव्यात काहीही बेकायदेशीर आढळले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच ‘द केरल स्टोरी’ चित्रपट पाहायला जाणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, कर्नाटकात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कर्नाटकातील लोकांनी मन बनवलेले आहे. भाजपच्या पाठिशी कर्नाटक उभा राहील, असा विश्वास आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.