coronavirus: अटी घालून आषाढीला परवानगी देण्याची वारकऱ्यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 05:46 IST2020-05-10T05:44:54+5:302020-05-10T05:46:08+5:30

हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, वारकऱ्यांची आर्त साद 

coronavirus: Warakaris demand permission for Ashadhi with conditions | coronavirus: अटी घालून आषाढीला परवानगी देण्याची वारकऱ्यांची मागणी

coronavirus: अटी घालून आषाढीला परवानगी देण्याची वारकऱ्यांची मागणी

- बाळासाहेब बोचरे 
मुंबई : हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, वारी चुकू न दे हरी, अशी आस मनी बाळगून असलेल्या वारकऱ्यांना नियमांच्या अधीन राहून आषाढीचा सुखसोहळा मोठ्या प्रमाणात नसला तरी प्रातिनिधिक स्वरूपात करून संत आणि देव यांच्या भेटीची परंपरा कायम राखावी, अशी भावनिक साद वैष्णवजणांमध्ये ऐकायला मिळत आहे.

शासन आणि प्रशासन यंत्रणेला झेपेल तेवढ्या प्रमाणातच वारीला परवानगी द्यावी, शेकडो वर्षांच्या सोहळ््यात खंड पडू नये, अशीच भावना अनेकांनी लोकमतकडे व्यक्त केली. आषाढी एकादशीपर्यंत कोरोना आटोक्यात येईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. पण सरकार अद्याप वारकºयांशी कसलीच चर्चा करत नाही, किंवा निर्णयही देत नसल्याने वारकºयांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे
पंढरपूरला आषाढी वारीसाठी सात संतांच्या मानाच्या पालख्या असतात. मुक्ताईनगर (जि. जळगाव) येथून निघणारी संत मुक्ताबाई यांच्या पालखीचे नियोजित प्रस्थान २७ मे रोजी आहे. तर १७ मे रोजी संत मुक्ताईचा समाधी सोहळा असल्याने त्याच दिवशी प्रस्थानाचीही तयारी केली जाते. त्यानंतर संत निवृत्तीनाथ महाराज (६ जून), संत तुकाराम महाराज आणि संत एकनाथ महाराजांची पालखी (१२ जून) व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी (१३ जून), संत सोपान काका (१८ जून) व संत नामदेव महाराजांची पालखी पंढरपूर येथूनच दशमीला प्रस्थान ठेवते.

वारीमध्ये बहुतांश वारकरी हे वयोवृद्ध असतात. महामारीच्या या संकटात त्यांची जबाबदारी कोण घेणार? त्यापेक्षा शासन
जसे सांगेल ते ऐकण्याशिवाय पर्याय नाही. प्रतीकात्मक पद्धतीने केवळ निवडक लोकांसमवेत पादुका घेऊन गेले तरी वारी पूर्ण होऊ शकते.
- बाळासाहेब पवार- आरफळकर, मालक, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा

प्रशासनही तणावात आहे. वारीची परंपरा खंडित होणार नाही या पद्धतीने शासनाने नियोजन करावे.
- ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, अध्यक्ष, समस्त वारकरी फडकरी- दिंडी संघटना

अगदी रझाकारांच्या काळातही पालखीवर संकटे आली. पण वारकºयांनी त्यावर मात केली. गेल्या ४२१ वर्षांत आमच्या सोहळ्यावर असे संकट आले नव्हते. नियमावली करून परवानगी दिली तर आम्ही शिस्तीने आणि जबाबदारीने सोहळा पार पाडू.
- रघुनाथ बुवा गोसावी पालखीवाले, सोहळा प्रमुख,
संत एकनाथ महाराज पालखी सोहळा

सुमारे सातशे वर्षांची परंपरा असलेला संत तुकाराम महाराजांचा पंढरपूर पालखी सोहळा कधी बंद पडला नाही. सरकारने परवानगी दिली तरी कमीत कमी लोकांमध्ये हा सोहळा पार पाडायचा. जास्त गर्दी होऊ द्यायची नाही, यावर आमचे एकमत झाले आहे.
- बाळासाहेब मोरे, माजी सोहळाप्रमुख, संत तुकाराम पालखी सोहळा

पालखी सोहळ्यावर पूवीर्ही संकटे आली होती. परंतु पालखी सोहळा कधीच खंडित झालेला नाही. प्रशासनाच्या विरोधातही आम्हाला भूमिका घ्यायची नाही.
- रविंद्र महाराज हरणे, सोहळा प्रमुख,
संत मुक्ताबाई पालखी सोहळा

पोलीस प्रशासनाचे सहकार्य घेऊन संतमेळा घडला पाहिजे. प्रशासनानेही त्याचा अंदाज घ्यावा आणि परवानगी द्यावी.
- मोहन महाराज बेलापूरकर,
संत निवृत्तीनाथ पालखी सोहळा

Web Title: coronavirus: Warakaris demand permission for Ashadhi with conditions