Coronavirus: कोरोनाग्रस्तांच्या सरकारी आकडेवारीवर संशय नको, पण...; देवेंद्र फडणवीसांचे 'अनुभवाचे बोल'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 20:42 IST2020-03-31T20:41:51+5:302020-03-31T20:42:33+5:30
जी काही पक्षांच्या मुखपत्रातून टीका करण्यात येते, ती थांबली पाहिजे, असंही फडणवीस म्हणाले आहेत.

Coronavirus: कोरोनाग्रस्तांच्या सरकारी आकडेवारीवर संशय नको, पण...; देवेंद्र फडणवीसांचे 'अनुभवाचे बोल'
मुंबईः राज्यात कोरोनाग्रस्त रुग्ण वाढत असून, गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याच संदर्भात विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी लोकमत फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून वाचकांच्या विविध प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. कोरोनाग्रस्तांच्या सरकारी आकडेवारीवर संशय नको. आकडेवारीवर शंका घेण्याचं कोणतंही कारण नाही, असंही देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे. कुठल्याही जिल्ह्यातील आकडेवारी गुप्त ठेवण्याचा तर प्रयत्न नाही ना, याकडे पाहावं लागेल. आकडेवारी लपवल्यास फार मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. ही आकडेवारी आपण योग्य समजू, पण सरकारनं कुठलीही आकडेवारी गुप्त तर ठेवली जात नाही आहे ना, याची खातरजमा करायला हवी, असंही फडणवीसांनी सांगितलं आहे.
जागतिक आरोग्य संस्थेनं काही निकष ठरवून दिले आहेत. त्या निकषांनुसारच चाचणी करावी लागते. चाचणीत चुकलो तर एखादा पॉझिटिव्ह निगेटिव्ह येईल आणि निगेटिव्ह पॉझिटिव्ह येईल. ज्यांना काहीही नाही तेसुद्धा चाचणीसाठी जाऊ लागल्यास आरोग्य यंत्रणेवर प्रचंड मोठा ताण येईल. मग खरे जे रुग्ण आहेत, त्यांना आपण सेवा देऊ शकणार नाही. कोरोनाची लक्षणं जलद आणि स्पष्ट आहेत, त्यामुळे लक्षण आढळल्यानंतर त्याची चाचणी आपल्याला करावी लागते.
पुण्याच्या मायलॅबनं टेस्टिंग किट तयार केली आहेत, ती टेस्टिंग किट स्वस्तदेखील आहेत. खासगी लॅबमध्येही तीन ते चार हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे सरकारी लॅबवर आपल्याला जास्त अवलंबून राहावं लागतं. भाजपाकडून होत असलेल्या टीकेवरीही त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आमच्याकडून कोणतीही टीका करण्यात येत नाही. परंतु जी काही पक्षांच्या मुखपत्रातून टीका करण्यात येते, ती थांबली पाहिजे, असंही फडणवीस म्हणाले आहेत.
पंतप्रधानांनी योग्य वेळी संपूर्ण लॉकडाऊन केलं. त्यांच्या प्रयत्नांमुळेच मोठ्या प्रमाणात आपण हा स्प्रेड होण्यापासून वाचवू शकलो. इटली, स्पेन आणि अमेरिकेत ज्या पद्धतीनं कोरोना व्हायरस पसरला आहे, तेवढा भारतात पसरलेला नाही. कोरोनापासून बचाव करण्याचं एकमेव साधन म्हणजे सोशल डिस्टन्सिंग हेच आहे. घराबाहेर न पडणे, आयसोलेशनमध्ये राहणे अशा पद्धतीनंच आपण कोरोनाला रोखू शकतो. भारत एक टीम असून, एकत्र होऊन कोरोनाशी लढा देत असल्याचा उल्लेखही त्यांनी केला आहे.