Coronavirus : राज्यातील ११७ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले; एकूण रुग्ण संख्या ११३५वर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 20:40 IST2020-04-08T20:39:36+5:302020-04-08T20:40:18+5:30
काल सकाळी मुंबईच्या केईएम रुग्णालयात धारावी येथील एका ६४ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

Coronavirus : राज्यातील ११७ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले; एकूण रुग्ण संख्या ११३५वर
मुंबई- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावानं सरकारचीही चिंता वाढवली आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, सरकार लोकांना घराबाहेर न पडण्याचं वारंवार आवाहन करत आहे. आज ११७ नवीन कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद असून, राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ११३५वर गेली आहे. आज राज्यात ८ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी ५ मुंबईत तर २ पुणे येथे तर १ कल्याण-डोंबिवलीमधील आहेत. काल सकाळी मुंबईच्या केईएम रुग्णालयात धारावी येथील एका ६४ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. या रुग्णास मधुमेह, उच्च रक्तदाब आणि फुप्फुसाचा जुनाट विकार होता.
काल संध्याकाळी मुंबईच्या के ई एम रुग्णालयात एका ४६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तिला मधुमेह होता. काल दुपारी मुंबईच्या के ई एम रुग्णालयात एका ५४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ६ एप्रिल रोजी रात्री कस्तुरबा रुग्णालयात कोविड १९ बाधित रुग्णाची सहवासित असणा-या ८५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तिला अस्थमा आणि फुप्फुसाचा जुनाट विकार होता. आज सकाळी मुंबईच्या केईएम रुग्णालयात एका ५९ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
आज पहाटे पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये ४४ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. या रुग्णास मधुमेह होता. त्याने परदेश प्रवास केलेला नव्हता.
पुण्याच्या ५५ वर्षीय पुरुषाचा ससून रुग्णालयात काल कोविड१९ मृत्यू झाला. कल्याण डोंबिवली येथील ५५ वर्षीय स्त्रीचा बाबू जगजीवनराम रुग्णालय, मुंबई येथे ६ एप्रिल रोजी मृत्यू झाला. त्यांना फुप्फुसाचा जुनाट विकार होता. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ७२ झाली आहे.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २७,०९० नमुन्यांपैकी २५,७५३ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ११३५. जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ११७ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ३४,९०४ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ४४४४ जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
निजामुद्दीन येथील बंगलेवाली मशिदीत मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता, त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यात या व्यक्तींपैकी २५ जण कोरोना बाधित आढळले आहेत. यापैकी लातूरमध्ये ८, बुलढाणा जिल्ह्यात ६ आणि प्रत्येकी २ जण पुणे, पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत तर प्रत्येकी एक जण रत्नागिरी, नागपूर, हिंगोली, जळगाव आणि वाशीममधील आहे. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. सध्या मुंबईत ६४५, बुलढाणा १९८, वसई विरारमध्ये १८३, मीरा भाईंदर मनपामध्ये २००, तर ठाणे मनपामध्ये ३३१ सर्वेक्षण पथके कार्यरत आहेत. राज्यात या प्रकारे एकूण ३६५८ सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी १२ लाखांहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.