वाघनखांवरून वाद, राजकारण, आता संभाजीराजे छत्रपतींचं मोठं विधान केलं असं आवाहन, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 16:34 IST2023-10-03T16:33:51+5:302023-10-03T16:34:58+5:30
Sambhaji Raje Chhatrapati : सरकारने या विषयावर सर्व विचारधारेच्या इतिहास तज्ञांशी चर्चा करून एकमताने मार्ग काढावा, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

वाघनखांवरून वाद, राजकारण, आता संभाजीराजे छत्रपतींचं मोठं विधान केलं असं आवाहन, म्हणाले...
लंडन येथील संग्रहालयात असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणण्यासाठी राज्य सरकारमधील मंत्री सुधीर मुनगंटीवार रवाना झाले आहेत. मात्र या वाघनखांच्या ऐतिहासिक सत्यासत्यतेवरून वेगवेगळे दावे केले जात आहेत. तसेच त्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपही होत आहेत. या वादाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. सरकारने या विषयावर सर्व विचारधारेच्या इतिहास तज्ञांशी चर्चा करून एकमताने मार्ग काढावा, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.
याबाबत सोशल मीडियावरून आपली भूमिका मांडताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, लंडन येथील संग्रहालयात असणारी वाघनखे महाराष्ट्रात तीन वर्षांच्या मुदतीवर प्रदर्शनासाठी आणले जात आहे. ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखान वधावेळी वापरले असल्याचा दावा राज्य सरकार करत आहे, मात्र अनेक इतिहास तज्ज्ञांनी त्यामध्ये दुमत व्यक्त केले आहे. २०१७ साली मी याठिकाणी भेट दिली होती. त्यावेळी तिथे लिहिलेल्या माहिती फलकावर केवळ तशी "शक्यता" असल्याचे लिहिलेले पाहण्यात आले होते. सरकारने या विषयावर सर्व विचारधारेच्या इतिहास तज्ञांशी चर्चा करून एकमताने मार्ग काढावा.
मात्र, सातारचे छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी भेट म्हणून दिलेल्या या वाघनखांस ऐतिहासिक मूल्य आहे, हे कुणीच नाकारू शकत नाही. त्यामुळे आपल्या इतिहासाशी निगडीत ऐतिहासिक महत्त्व असणारे हे वाघनख केवळ तीन वर्षांच्या मुदतीवरच आणले जात आहे व मुदत संपल्यावर ते इंग्लंडला परत करावे लागेल, हे वेदनादायी आहे. त्यामुळे सरकारने हे वाघनख कायमस्वरूपी त्याच्या मूळ ठिकाणी, म्हणजेच महाराष्ट्रात आणण्याचे प्रयत्न करणे अधिक गरजेचे आहे, असेही संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.