राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 14:45 IST2025-06-07T14:43:09+5:302025-06-07T14:45:11+5:30
Congress Vijay Wadettiwar News: ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या प्रयत्नांमुळे सत्ताधारी का अस्वस्थ होत आहेत, अशी विचारणा विजय वडेट्टीवार यांनी केली.

राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
Congress Vijay Wadettiwar News: महाराष्ट्रात झालेली विधानसभा निवडणूक ही मॅच फिक्सिंग होती. या निवडणुकीत नेमकी काय झाले याचे सत्य लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मांडले आहे. दम असेल तर यावर खुलासा करावा, असे आव्हान काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी दिले.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात निवडणुकीत झालेले मतदान, २०२४ लोकसभा निवडणुकी नंतर विधानसभा निवडणुकीत मतदारांची वाढलेली संख्या आणि महाराष्ट्रात मतदानाची वेळ संपल्यावर अचानक वाढलेली मतदानाची टक्केवारी याबाबत विविध लेखातून भूमिका मांडली आहे. मुळात केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त निवडण्याची प्रक्रियाच सदोष आहे. त्यानंतर विविध यंत्रणांना हाताशी धरून सत्ताधाऱ्यांनी निवडणूक जिंकली, असा आरोप विधिमंडळ नेते वडेट्टीवर यांनी केला. मतदानाची वेळ संपल्यावर २०२४ विधानसभा निवडणुकीत साडे आठ टक्के सरासरीने मतदानाची टक्केवारी वाढते हे संशयास्पद आहे. त्यामुळे महाराष्ट्रात बेईमान पद्धतीने सरकार आलेले आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वस्तुनिष्ठ माहिती दिली आहे, यावर संबंधितांनी खुलासा केला पाहिजे, असेही वडेट्टीवार म्हणाले.
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत
राज्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा सुरू आहे. राज्यातील महाराष्ट्र विरोधी सरकार घालवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर त्याचे आम्ही स्वागत करतो असे वडेट्टीवार म्हणाले. ठाकरे बंधू एकत्र येण्याची भीती सत्ताधाऱ्यांना का वाटते? त्यांच्या युतीच्या बातम्यांनी सत्ताधारी का अस्वस्थ होत आहेत असा सवाल ही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
दरम्यान, राज्यात सारथी, बार्टी, महाज्योती यांना समान निधी वाटप केल्याचा दावा सरकार करत आहे. असे असले तरी सारथीला इमारत आणि हॉस्टेल बांधण्यासाठी अधिकचा निधी दिला आहे. इतर संस्थांना कमी निधी दिला आहे. महाराष्ट्राची तिजोरी ही ओबीसी समाजासाठी नाही का? निवडणुकीत भाजप ओबीसी समाजाची मत घेते आणि सरकार आल्यावर मात्र त्यांना दुर्लक्ष करतात हा अन्याय आहे. सरकारने सर्वांना समान निधी आणि न्याय द्यावा अशी मागणी विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली.