“देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोघेही टेरर नेते, त्यांचे किती काळ जमते ते पाहू”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 01:23 PM2023-07-13T13:23:54+5:302023-07-13T13:26:31+5:30

Devendra Fadnavis And Ajit Pawar: सध्याच्या राजकारणावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सडकून टीका केली असून, आगामी काळात काँग्रेसच्या जागा वाढतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

congress vijay wadettiwar criticized eknath shinde devendra fadnavis and ajit pawar govt | “देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोघेही टेरर नेते, त्यांचे किती काळ जमते ते पाहू”

“देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोघेही टेरर नेते, त्यांचे किती काळ जमते ते पाहू”

googlenewsNext

Devendra Fadnavis And Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी अचानकपणे बंडखोरी केली. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावरून शिंदे-फडणवीस-पवार यांच्यात मतभेद असून, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या आमदार, समर्थकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यातच आता देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोघेही टेरर नेते, त्यांचे किती काळ जमते ते पाहू, असे महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, मतदानाला जायची इच्छा राहिली नाही, अशी लोकांची भावना आहे. यावरुन राज्यातील राजकारण्यांना लाज वाटावी, अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. विकासाच्या नावावर सरकार आणायचे आणि विकासकामे ठप्प पाडायची. सत्तेच्या मलिदेसाठी भांडायचे असा लज्जास्पद प्रकार जनता बघत आहे. अशा राजकारण्यांची कशी जिरवायची अशी संधीची वाट लोक बघत आहेत. अर्थ विभाग अजित पवारांकडे गेले तर ज्या कारणामुळे हे लोक सत्तेतून बाहेर पडले आणि तेच कारण घेऊन सत्तेच्या बाहेर पडतील का याची जनता वाट पाहत आहे, अशी खोचक टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. 

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोघेही टेरर नेते

देवेंद्र फडणवीस असो किंवा अजित पवार दोन्ही नेते टेरर आहेत, त्यांचे किती काळ जमते ते पाहू. त्यांना दोन-तीन मंत्रिपद मिळतील अशी अपेक्षा आहे. पुढचे कसे शांत होतील तेही पाहू. खरंतर ११५ लोकांना (भाजप) ३३ टक्के वाटा आणि ३५ वाल्यांनाही (राष्ट्रवादी काँग्रेस) ३३ टक्के वाटा, हे सत्तेचे समीकरण जुळवून सत्तेतून जेवढे मिळेल तेवढे आपल्या घशात घालण्याचे सुरु आहे, या शब्दांत वडेट्टीवार यांनी हल्लाबोल केला. 

डबे ठेऊ नका इंजिनच लावा

डबल इंजिन ठीक आहे. आता तिसरे इंजिन, पुन्हा कोणीतरी म्हणे चौथे इंजिन. डबे ठेऊ नका इंजिनच लावा. बिना डब्याचे इंजिन असलेले सरकार. ज्यात लोकांना स्थान नाही फक्त सत्तेमध्ये सहभागी होणाऱ्यांना स्थान आणि चालवणाऱ्याची मजा, मागे पब्लिक नाही, डबे नाही अशी अवस्था या लोकांची झाली आहे, असा निशाणा वडेट्टीवार यांनी साधला. तसेच आमच्या पक्षात लोकसभेला जबाबदाऱ्या वाटून घेऊन काम करावं लागेल. महाराष्ट्रात पोषक वातावरण आहे. सर्वांच्या नजरा काँग्रेस पक्षाकडे आहे. काँग्रेसवर विश्वास आहे. येणाऱ्या काळात महाराष्ट्राला काँग्रेसला मोठे यश मिळणार आहे, आमच्या जागा वाढणार आहे, असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

दरम्यान, पूर्वी तीन पक्षांचे सरकार होते त्याला रिक्षा म्हणत होते. त्या रिक्षाने संकटावर मात करत अडीच वर्षे सरकार चालवले. आता यांच्या तीन चाकी रिक्षा म्हणायचे की घसरगाडी म्हणायचे? यांच्या तीन चाकातील पहिला टायर कधी पंचर होतो ते आता लोक बघणार आहे. सत्तेसाठी एवढा हावरटपणा महाराष्ट्राने कधीच पाहिला नाही, जो आता महाराष्ट्रातील जनतेला पाहायला मिळत आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. 

 

Web Title: congress vijay wadettiwar criticized eknath shinde devendra fadnavis and ajit pawar govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.