“बाबासाहेब आंबेडकर, संविधानाचा अवमान, विटंबना करणाऱ्यांना कठोर शासन करा”: नाना पटोले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 14:46 IST2024-12-12T14:45:56+5:302024-12-12T14:46:27+5:30
Congress Nana Patole Reaction On Parbhani Agitation: संविधान न मानणाऱ्या विचाराचे लोक सत्तेत आहेत त्यामुळे असे प्रकार होत आहेत. परभणीतील घटनेचा नागपूरच्या अधिवेशनात सरकारला जाब विचारू, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

“बाबासाहेब आंबेडकर, संविधानाचा अवमान, विटंबना करणाऱ्यांना कठोर शासन करा”: नाना पटोले
Congress Nana Patole Reaction On Parbhani Agitation: परभणीत भारतीय राज्यघटनेची विटंबना करण्याची घटना अत्यंत निषेधार्ह आहे. हा प्रकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबडेकर व संविधानाला मानणाऱ्या कोट्यवधी लोकांचा घोर अपमान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या पवित्र संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे, असा संतप्त सवाल करून संविधानाची विटंबना करणाऱ्यांच्या मुसक्या आवळून त्यांना कठोर शासन करा, असे महाराष्ट्रात प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
परभणीतील घटनेवर बोलताना नाना पटोले म्हणाले की, या घटनेचा काँग्रेस पक्ष तीव्र शब्दात निषेध करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकरांच्या विचाराच्या महाराष्ट्रात संविधानाची विटंबना करणाचा प्रकार चिंतानजक व महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालण्यास लावणारा आहे. अशा विकृती शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजेच पण परभणीत आगडोंब उसळत असताना राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री मात्र मलईदार खाती व मंत्रीपदे वाटून घेण्यात व्यस्त आहेत. या सरकारला राज्याचे काही देणेघेणे नाही. संविधान न मानणाऱ्या विचाराचे लोक सत्तेत आहेत त्यामुळे असे प्रकार होत आहेत, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
नागपूरच्या अधिवेशनात सरकारला जाब विचारू
परभणीत संविधानाची विटंबना झाल्यानंतर शहरात पोलीसांनी बेडकरी अनुयायांना अमानुष मारहाण केली, अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या, संचारबंदी लावली, इंटरनेट, एसटी सेवा बंद केली. पोलीस व प्रशासन परभणीतील परिस्थिती व्यवस्थित हाताळू शकले नाहीत. आंबेडकरी अनुयायांना केलेल्या मारहणाची चौकशी करून जिल्हा पोलीस अधिक्षक यांना तात्काळ निलंबत करावे अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. परभणीतील घटनेचा नागपूरच्या अधिवेशनात सरकारला जाब विचारू पण अशा घटना महाराष्ट्रात होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. लोकांनी अफवांना बळी न पडता लोकशाही मार्गाने या घटनेचा निषेध करावा असे आवाहन नाना पटोले यांनी केले आहे.