“महायुतीची परिस्थिती कौरवांसारखी झाली, आपसात लढूनच कार्यक्रम संपेल”; काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 11:20 IST2024-12-23T11:19:44+5:302024-12-23T11:20:07+5:30

Congress Nana Patole News: निवडणूक आयोगाच्या कृपेने महायुतीला बहुमत मिळाले. हे सरकार जनतेसाठी काही करू शकले नाही. जनतेचे प्रश्न काँग्रेसला महत्त्वाचे आहेत, असे टीका काँग्रेस नेत्यांनी केली.

congress nana patole criticized mahayuti govt over various issues | “महायुतीची परिस्थिती कौरवांसारखी झाली, आपसात लढूनच कार्यक्रम संपेल”; काँग्रेसची टीका

“महायुतीची परिस्थिती कौरवांसारखी झाली, आपसात लढूनच कार्यक्रम संपेल”; काँग्रेसची टीका

Congress Nana Patole News: विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला मिळालेल्या भरघोस यशानंतर एका महिन्याने राज्य मंत्रिमंडळ खातेवाटपासह आकाराला आले. आता तिन्ही पक्षातील मंत्र्यांमध्ये आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळवण्यावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. जिल्ह्यात ज्या पक्षाचे जास्त आमदार त्याला पालकमंत्रिपद असा फॉर्म्युला ठरल्याचे महायुतीतील सूत्रांनी सांगितले. काही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्रिपदावर एकापेक्षा जास्त पक्षाच्या मंत्र्यांनी दावा सांगितल्याने याचे वाटप करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कसरत होणार आहे. 

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी महायुतीला अनेक मुद्द्यांवरून घेरण्याचा प्रयत्न केला. बीड आणि परभणी येथील प्रकरणांवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटल्याचे दिसले. यावरून मविआ नेत्यांनी भाजपावर निशाणा साधला. यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुतीवर टीका केली आहे. 

हायुतीची परिस्थिती कौरवांसारखी झाली, आपसात लढूनच कार्यक्रम संपेल

अजित दादा स्वतः म्हणत असतील की, काही लोक नाराज आहे, तेव्हा त्याच्यापेक्षा अधिक काय पाहिजे. हा एवढा मोठा पुरावा त्यांनी दिला आहे. यांना जनतेचे काही घेणे देणे नाही. या सरकारमध्ये काय गडबड सुरू आहे, ते स्पष्ट होते. महायुतीची परिस्थिती कौरवांसारखी आहे. आपसात लढून कार्यक्रम संपणार आहे. मलाईदार खात्यांकरिता लढाई लांब चालली आहे. हिवाळी अधिवेशनात हे खातेवाटप करू शकले नाही. जनतेसाठी हे सरकार काहीच करू शकले नाही. आता पालकमंत्र्यासाठी कोणते जिल्हे घ्यायचे याची भांडण होतील, असा दावा नाना पटोले यांनी केला. 

दरम्यान, भाजपा लोकशाहीवर विश्वास न ठेवणारी पार्टी आहे. महाराष्ट्र आणि केंद्रातील सरकारच्या माध्यमातून हुकूमशाही लोकशाहीत वापरली जात आहे. जनतेचे प्रश्न काँग्रेसला महत्त्वाचे आहेत. येणारे बजेट आणखी किती तुटीचे असणार आणि त्याचा बोजा महाराष्ट्राच्या जनतेवर पाडून महागाई वाढवणार, अशी विचारणा करत, निवडणूक आयोगाच्या कृपेने बहुमतात सरकार आले. ते जनतेच्या कृपेने आलेले नाही. महागाई, शेतकरी यासाठी काय करणार? अनुशेष कशावरून काढणार की केवळ मूठभर लोकांना फायदा होईल. हे संवेदनाहीन आणि लूट करणारे सरकार आहे, या शब्दांत नाना पटोले यांनी हल्लाबोल केला.


 

Web Title: congress nana patole criticized mahayuti govt over various issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.