“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 18:34 IST2025-06-26T18:32:38+5:302025-06-26T18:34:37+5:30
Congress Harshwardhan Sapkal: शक्तिपीठ महामार्ग आणि हिंदी सक्तीवरून राज्यातील विरोधक एकवटल्याचे चित्र दिसत असल्याचे म्हटले जात आहे.

“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
Congress Harshwardhan Sapkal: पहिली इयत्तेपासून राज्यात तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा शिकविण्याच्या राज्य सरकारच्या सक्तीविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. ५ जुलै शनिवारी सकाळी १० वाजता मुंबईत मोर्चा असणार आहे. तसेच देशातील बहुतांशी वर्ग हिंदी बोलतो. पण, मुले विशिष्ट वयात हिंदी किती आत्मसात करतील याचा विचार व्हावा. त्यामुळे प्राथमिक शिक्षणात हिंदी सक्तीचे नकोच. सरकारनेही पाचवीपर्यंतचा हिंदीचा हट्ट सोडावा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. यानंतर आता काँग्रेसनेही हिंदी सक्तीच्या विरोधातच असल्याची ठाम भूमिका घेतली आहे.
पत्रकारांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, हिंदी सक्तीविरोधातील मोर्चासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, हिंदी सक्तीच्या विरोधात काही संघटना काम करत आहेत, सरकार विरोधात आंदोलन करण्याचा त्यांनी प्रस्तावही दिला असून मराठी भाषेसाठी जी आंदोलने, मोर्चे काढले जातील त्यात काँग्रेसचे प्रतिनिधी सहभागी होतील. हा विषय पक्षाचा नसून महाराष्ट्र धर्म, मराठी भाषा व संस्कृतीचा आहे, असे सपकाळ यांनी स्पष्ट केले.
दिल्लीच्या आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शक्तिपीठ महामार्गाचा घाट दिल्लीच्या आकाच्या इशाऱ्यावर घातला आहे. लाडक्या उद्योगपतींना त्यांचा कच्चा माल विदेशात पाठवण्यासाठी मध्य भारतातून गोव्यातील बंदरापर्यंत एक कॉरिडोर हवा आहे, त्यांच्यासाठी हा रेड कारपेट घातला जात आहे. सरकारकडे कर्मचाऱ्यांचे पगार करण्यास पैस नाहीत, ठेकेदाराला देण्यास पैसे नाहीत. लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्यास पैसे नाहीत, शेतकरी कर्जमाफीस पैसे नाहीत. आणि शक्तीपीठ महामार्गासाठी २० हजार कोटींची तरतूद केली आहे. हा खर्च १.५ लाख कोटी पर्यंत जाईल व त्यातून मलिदा खाण्यासाठी हे सर्व सुरु आहेत. महाराष्ट्राला दिवाळखोरीकडे घेऊन जाण्याची ही सुरुवात आहे. भाजपा सरकार हे सर्वसामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार यांच्यासाठी नाही तर मुठभर उद्योगपतींसाठी आहे, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
दरम्यान, हिंदी भाषेच्या सक्तीला आमचा विरोध आहे आणि राहणारच. हिंदी भाषेला आमचा विरोध नाही. महाराष्ट्रात हिंदी चित्रपटसृष्टी बॉलिवूड उभे राहिले. आम्हाला हिंदीचे वावडे नाही परंतु हिंदी सक्तीमागे छुपा अजेंडा आहे. कालांतराने देशात एकच पक्ष राहील त्यादिशेने ही वाटचाल सुरू आहे. सरकारकडून भाषिक आणीबाणी लादली जात आहे. त्याचा विरोध आम्ही करणारच आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.