Congress Bharat Jodo Yatra: शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी स्वीकारले काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचे निमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2022 20:25 IST2022-10-17T20:22:08+5:302022-10-17T20:25:14+5:30
राहूल गांधी यांनी सुरू केलेली 'भारत जोडो यात्रा' नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नांदेड जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे.

Congress Bharat Jodo Yatra: शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी स्वीकारले काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचे निमंत्रण
नांदेड: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील विविध राज्यात भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. या यात्रेद्वारे ते केंद्रातील मोदी सरकारविरोधात देशातील सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन करत आहेत. ही यात्रा दिवाळीनंतर महाराष्ट्रात येणार आहे. या 'भारत जोडो यात्रे'त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत. त्यांनी आज काँग्रेसचे निमंत्रण स्वीकारले आहे.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात आणि मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार अमरनाथ राजूरकर यांनी आज एका शिष्टमंडळासह मातोश्रीवर उद्धव ठाकरे तर सिल्व्हर ओक येथे शरद पवार यांची भेट घेतली.
काँग्रेस नेते खासदार राहूल गांधी यांनी सुरू केलेली 'भारत जोडो यात्रा' नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नांदेड जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणार असून, आपणही या यात्रेत सहभागी व्हावे, असे निमंत्रण काँग्रेसच्या शिष्टमंडळाने उभय नेत्यांना दिले. दोहोंनीही हे निमंत्रण स्वीकारले असून, शरद पवार स्वतः तर शिवसेनेकडून उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यात्रेत सहभागी होणार असल्याचे शिष्टमंडळाला सांगण्यात आले.
भारत जोडो यात्रेला देशभरातील विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळत असून, दिवसेंदिवस प्रतिसाद वाढतोच आहे. महाराष्ट्रातही राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने (ठाकरे गट) यात्रेत सहभाही होण्यास सहमती दिल्याने त्याचे महत्व अधिक वाढले आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेणाऱ्या शिष्टमंडळात माजी मंत्री नसीम खान, आमदार विश्वजीत कदम, महाराष्ट्राचे सहप्रभारी बी.एम. संदीप, आ. सुधीर तांबे , आबा दळवी यांचा समावेश होता.