काँग्रेसचे राज्यातील ४५ जिल्हाध्यक्ष बदलणार; महिनाअखेर निवडीची प्रक्रिया पूर्ण करणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 09:27 IST2026-04-05T09:20:52+5:302026-04-05T09:27:42+5:30
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लोकमतला ही माहिती दिली.

काँग्रेसचे राज्यातील ४५ जिल्हाध्यक्ष बदलणार; महिनाअखेर निवडीची प्रक्रिया पूर्ण करणार!
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: काँग्रेसचे महाराष्ट्रातील किमान ४५ जिल्ह्याध्यक्ष लवकरच बदलले जाणार आहेत. जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्षांसह ८ हजार नवे पदाधिकारी येत्या दोन महिन्यात नेमण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लोकमतला ही माहिती दिली.
राज्यात काँग्रेसचे संघटनात्मकदृष्ट्या ६० जिल्हे आतापर्यंत होते. त्यातील ४५ जिल्हाध्यक्ष बदलले जातील. या शिवाय अलिकडेच सपकाळ यांनी संघटनात्मकदृष्ट्या १२ नवीन जिल्हे तयार केले आहेत, त्यांच्याही अध्यक्षांची नियुक्ती लवकरच केली जाणार आहे.
अखिल भारतीय काँग्रेस सध्या महाराष्ट्रात ‘संघटन सृजन’ कार्यक्रम राबवत आहे. त्यासाठी दिल्लीहून प्रत्येक जिल्ह्यात एक निरिक्षक पाठविण्यात आले असून नवीन अध्यक्षांच्या नावांचे पॅनेल केंद्रीय नेतृत्वाकडे देतील. नवीन जिल्ह्याध्यक्षांची नियुक्ती करणार आहे.
पाच वर्षे पूर्ण झालेल्या अध्यक्षांना हटवणार
पाच वर्षे किंवा त्याहून अधिक काळ जिल्हाध्यक्ष असलेल्या सर्वांनाच हटवून त्याजागी नवीन चेहरे दिले जाणार आहेत. अ.भा.काँग्रेसने पाच वर्षांचा निकष निश्चित केला आहे. महाराष्ट्रात पाच वर्षांहून अधिक काळ जिल्हाध्यक्ष असलेले बरेचसे नेते आहेत, त्यांना बदलले जाईल.
सपकाळ यांनी सांगितले की नवीन नियुक्ती करण्यास कोणाचाही विरोध नाही. बरीच वर्षे अध्यक्ष राहिलेले नेतेही त्यांच्या जागी नवीन चेहरा द्या असा आग्रह धरत आहेत. आहेत त्या जिल्हाध्यक्षांना हटवायचे आहे असा विषय नाही, नवीन चेहर्यांना संधी देण्याचे धोरण अ.भा.काँग्रेसने स्वीकारले आहे.