मराठा आरक्षण निकालाच्या समीक्षेसाठी कायदेतज्ज्ञांची समिती; सोमवारपासून मुख्य सचिव घेणार नोकरभरती प्रक्रियेचा आढावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 01:42 AM2021-05-09T01:42:27+5:302021-05-09T06:53:27+5:30

सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाने ९ सप्टेंबर २०२०पर्यंत झालेल्या नियुक्त्यांना संरक्षित केले आहे. परंतु, नोकर भरती प्रक्रियेत निवड आणि नियुक्ती या दोन बाबी आहेत.

Committee of Legal Experts for Review of Maratha Reservation Results | मराठा आरक्षण निकालाच्या समीक्षेसाठी कायदेतज्ज्ञांची समिती; सोमवारपासून मुख्य सचिव घेणार नोकरभरती प्रक्रियेचा आढावा

मराठा आरक्षण निकालाच्या समीक्षेसाठी कायदेतज्ज्ञांची समिती; सोमवारपासून मुख्य सचिव घेणार नोकरभरती प्रक्रियेचा आढावा

googlenewsNext

मुंबई :  सामाजिक व शैक्षणिक मागास (एसईबीसी) प्रवर्गाच्या प्रलंबित नोकर भरती प्रक्रियेचा राज्याचे मुख्य सचिव सोमवारपासून संबंधित विभागाच्या सचिवांकडून आढावा घेणार असून, मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची समीक्षा करण्यासाठी सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी जाहीर केले. (Committee of Legal Experts for Review of Maratha Reservation Results)

सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाने ९ सप्टेंबर २०२०पर्यंत झालेल्या नियुक्त्यांना संरक्षित केले आहे. परंतु, नोकर भरती प्रक्रियेत निवड आणि नियुक्ती या दोन बाबी आहेत. त्या पार्श्वभूमीवर पूर्ण झालेल्या व अपूर्ण अशा दोन्ही भरती प्रक्रियांचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिव संबंधित विभागांच्या सचिवांसमवेत तातडीने बैठका घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे प्रभावित झालेल्या उमेदवारांना न्याय देण्याबाबत राज्य शासन अनुकूल असून, मुख्य सचिवांच्या अहवालानंतर पुढील निर्णय घेतले जातील.

मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या साडेपाचशेहून अधिक पानांच्या निकाल पत्राचे कायदे पंडितांच्या माध्यमातून विस्तृत विश्लेषण करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली पुढील दोन दिवसात सहा किंवा सात सदस्यांची समिती नेमली जाईल. ही समिती या निर्णयाचा बारकाईने अभ्यास करून आपले निष्कर्ष तसेच उपलब्ध कायदेशीर पर्यायांबाबत  राज्य सरकारला शिफारसी करेल. या समितीचा अहवाल १५ दिवसांत प्राप्त होईल, अशी अपेक्षा आहे. पुनर्विचार याचिकेसंदर्भात या समितीच्या शिफारसीनुसार निर्णय घेतला जाईल, असे चव्हाण म्हणाले. 

नोकरभरती प्रक्रियेसंदर्भात अडचणी मांडण्यासाठी राज्यभरातील एसईबीसी उमेदवारांचे रोज अनेक दूरध्वनी येत आहेत. या उमेदवारांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी सर्व जिल्ह्यातील अतिरिक्त जिल्हाधिकारी विशेष कार्य अधिकारी म्हणून काम पाहतील. एसईबीसी उमेदवारांनी या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे आपल्या अडचणी मांडाव्यात. जिल्ह्याच्या स्तरावर त्याचे निराकरण न झाल्यास संबंधित प्रकरण मुख्य सचिवांकडे मागवून त्यावर निर्णय घेतले जातील, असा महत्त्वपूर्ण निर्णय शनिवारच्या बैठकीत झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले. 

राज्य शासनाने मराठा समाजासाठी यापूर्वी घेतलेल्या विविध निर्णयांच्या सद्यस्थितीचा मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमिती आढावा घेणार असल्याचे ते म्हणाले. मराठा आरक्षणाचा लढा अजून संपलेला नाही. राज्य सरकार यापुढेही प्रयत्न सुरूच ठेवणार आहे. परंतु, काही मंडळी उद्रेकाची भाषा करत आहेत. हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. त्यामुळे आंदोलनाची भूमिका आश्चर्यकारक असून, हे केवळ राजकारणासाठी सुरू असल्याची खंतही चव्हाण यांनी व्यक्त केली.

मराठा समाजाला न्याय देण्यासाठी कटिबद्ध : एकनाथ शिंदे
मराठा आरक्षणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल धक्कादायक व अनपेक्षित आहे. मराठा समाजाच्या हितासाठी राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी एकमताने हा कायदा पारीत केला होता. अजूनही राज्य सरकार या संदर्भात सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या विषयावर कोणीही राजकारण न करता, एकदिलाने काम करावे. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे उपसमितीचे सदस्य तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

या बैठकीला उपसमितीचे अध्यक्ष मंत्री अशोक चव्हाण, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, विशेष विधीज्ञ ॲड. विजयसिंह थोरात, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, विधी व न्याय विभागाचे सचिव भूपेंद्र गुरव, उपसचिव संजय देशमुख, राज्य शासनाचे वकील ॲड. अक्षय शिंदे, ॲड. वैभव सुगदरे, राज्य शासनाने नेमलेल्या मराठा समाजातील खासगी वकिलांच्या समन्वय समितीचे सदस्य ॲड. आशिषराजे गायकवाड, ॲड. अभिजीत पाटील, आदी उपस्थित होते. मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य तथा मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे दूरदृश्य प्रणालीच्या (व्हिडीओ कॉन्फरन्सिंग) माध्यमातून सहभागी झाले होते.

पोलिसांवर ताण आणणारे कृत्य नकाे : गृहमंत्री
मराठा आरक्षणासंदर्भात कोणीही भडक वक्तव्ये करून समाजामध्ये विद्वेष निर्माण करू नये. या संदर्भात पोलीस यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. सध्या राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर असून, पोलीस त्यामध्ये व्यस्त आहेत. त्यांचा ताण वाढेल, असे कृत्य करणे योग्य ठरणार नाही. आरक्षणासंदर्भात भावना कितीही तीव्र असल्या तरी रस्त्यावर उतरून अशांतता निर्माण करू नये, असे आवाहन करून उपसमितीचे सदस्य तथा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी हा विषय चर्चा करून कायदेशीर मार्गाने सोडवता येईल, असे सांगितले. 

समितीचा अहवाल १५ दिवसांत मिळणार
ही समिती या निर्णयाचा बारकाईने अभ्यास करून आपले निष्कर्ष तसेच उपलब्ध कायदेशीर पर्यायांबाबत  राज्य सरकारला शिफारसी करेल. या समितीचा अहवाल १५ दिवसांत प्राप्त होईल, अशी अपेक्षा आहे. 
 

Web Title: Committee of Legal Experts for Review of Maratha Reservation Results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.