“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 23:20 IST2025-09-18T23:18:53+5:302025-09-18T23:20:59+5:30
CM Devendra Fadnavis Reply To Rahul Gandhi On Vote Chori: महाराष्ट्रातील पराभव जिव्हारी लागला आहे. जनतेने जो झटका दिला, त्यातून ते अजूनही वर येऊ शकलेले नाहीत, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना लगावला आहे.

“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
CM Devendra Fadnavis Reply To Rahul Gandhi On Vote Chori: महाराष्ट्रातील पराभव त्यांना जिव्हारी लागला आहे. त्यांना फार अपेक्षा होती. त्यांनी हॉटेलही बूक करून ठेवले होते. त्यांनी मंत्रिमंडळाची रचना केली होती. काँग्रेसमध्ये अनेक मुख्यमंत्री तयार झाले होते आणि अशातच त्यांना जो जनतेने झटका दिला त्यातून ते अजून वर येऊ शकलेले नाहीत. आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या संदर्भात केलेली सगळी वक्तव्य खोटी निघाली. सगळी वक्तव्य ही पुराव्याविना केली होती आणि त्याचे पुरावे निवडणूक आयोगाने तात्काळ दिल्याने ते तोंडावर आपटले आहेत, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींनी केलेल्या मतचोरीच्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला.
पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राहुल गांधींनी हायड्रोजन बॉम्ब-हायड्रोजन बॉम्ब सांगितला, तर अख्खा भारत घाबरलेला होता की, आता हे कोणता हायड्रोजन बॉम्ब फोडणार, पण लवंगी फटाका ते फोडू शकले नाहीत. त्यांनी फुसका बार लावला आहे. मी यापूर्वीही सांगितले होते की, राहुल गांधी हे सीरियल लायर आहेत. रोज खोटे बोलायचे आणि गोबेल्सचे तत्व मांडायचे, हा प्रयत्न त्यांचा असतो. इतके वेळा निवडणूक आयागाने त्यांना नोटीस दिली. परंतु, ते एकही पुरवा आजपर्यंत देऊ शकले नाहीत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
अशा प्रकारचा नेता मी यापूर्वी कधीही बघितलेला नाही
तरीही राहुल गांधींचे एका गोष्टीसाठी कौतुक करतो की, प्रत्येक वेळी माध्यमांसमोर येऊन खोटे बोलण्याची त्यांची हिंमत खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. अशा प्रकारचा नेता मी यापूर्वी कधीही बघितलेला नाही, असा खोचक टोला मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला. तसेच ते कितीही खोटे बोलले तरी जनतेचा त्यांच्यावर विश्वास नाही. त्यांना जनतेतच जावे लागेल. जनतेत जातील तरच निवडणुकींचे निकाल कदाचित कधीतरी त्यांच्या बाजूने येतील. पण असेच खोटे बोलत राहिले तर कधीच त्यांच्या बाजूने निकाल येऊ शकत नाही, असे फडणवीस म्हणाले.
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयुक्त मतचोरीला संरक्षण देत आहेत. विरोधकांची नावे मतदार यादीतून वगळली जातात. त्यात प्रामुख्याने दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक समुदायाची नावे हटवण्यात आली. मतदारांची नावे जाणुनबुजून यादीतून काढण्यात आली. ज्यांच्या नावाने ही नावे काढली त्यांनाही याची कल्पना नाही. आळंदमध्ये याहून अधिक मते वगळली गेली असतील परंतु आम्ही ६ हजार मतदार काढले. इतर राज्यातील मोबाईल नंबर वापरून कर्नाटकातील मतदार यादीतून काढले गेले, असा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला.