महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 15:58 IST2025-06-07T15:57:56+5:302025-06-07T15:58:07+5:30
CM Devendra Fadnavis Replied Congress Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले.

महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
CM Devendra Fadnavis Replied Congress Rahul Gandhi: महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीच्या प्रक्रियेविषयी मी ३ फेब्रुवारीला संसदेत दिलेल्या भाषणात आणि त्यानंतर पत्रकार परिषदेत चिंता व्यक्त केली होती. देशात झालेल्या निवडणुकांविषयी मी त्याआधीही संशय घेतलेला आहे. प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक ठिकाणी गडबडी होतात असे मी म्हणत नाही; परंतु जे घडले आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. मी छोट्या-मोठ्या गोंधळाबद्दल बोलत नाही, तर आपल्या राष्ट्रीय स्तरावरील संस्थांवर ताबा मिळवून केल्या जाणाऱ्या गैरप्रकारांबद्दल बोलत आहे. पूर्वी निवडणुकांमध्ये काही विचित्र गोष्टी होत असत; परंतु २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पूर्णपणे विचित्र आणि अनाकलनीय होती. या निवडणुकीत इतके गैरप्रकार झाले की, सर्व काही लपवण्याचे आटोकाट प्रयत्न करूनही काही गैरप्रकारांचे पुरावे समोर आलेच. अनधिकृत माहिती बाजूला ठेवली तरीही केवळ अधिकृत अशा आकडेवारीवरूनही सगळा खेळ समोर येतो. ‘मॅच फिक्सिंग’ झालेली निवडणूक लोकशाहीसाठी विषसमान आहे. महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीतल्या गोंधळ-गडबडीचे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ पुरावे दोन आरोपींकडे बोट दाखवतात : निवडणूक आयोग आणि भाजप!, असे काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी काही वृत्तपत्रांमध्ये प्रदीर्घ लेख लिहीत महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रियेवरच बोट ठेवले. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असून, राहुल गांधी यांच्या दावे, आरोपांवर भाजपा नेते प्रत्युत्तर देताना काँग्रेसवर पलटवार करत आहेत. पत्रकारांशी संवाद साधत असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना राहुल गांधी यांच्या या लेखाबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य करताना राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.
राहुल गांधींच्या आक्षेपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
जोपर्यंत राहुल गांधी सत्य स्वीकारणार नाहीत, जोपर्यंत ते जागे होऊन जमिनीवर काम करणार नाहीत, तोपर्यंत त्यांच्या पक्षाला कुठलेही भवितव्य उरलेले नाही. मला वाटते की, स्वतःशी खोटे बोलून, स्वत:ला दिलासा देण्याचे काम राहुल गांधी करत आहेत. महाराष्ट्राच्या जनतेचा, आमच्या लाडक्या बहिणींचा अपमान राहुल गांधी करत आहेत. त्यांनी जागे झाले पाहिजे, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
दरम्यान, रोज खोटे बोलले की लोकांना ते खरे वाटते, असे राहुल गांधींना वाटत आहे. त्यामुळेच त्याच त्या गोष्टी राहुल गांधी सातत्याने बोलतात. हा आरोप यापूर्वी त्यांनी केला होता. निवडणूक आयोगाने यापूर्वीच्या निवडणुकांत किती मतदार वाढले होते, या निवडणूकीत किती वाढले हे सगळे सप्रमाण दिले. पण रोज खोटे बोलायचे ही सवय राहुल गांधी यांना लागली आहे. कारण ते स्वत:च्या मनाला समजावत आहेत, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या आक्षेपांवर प्रत्युत्तर दिले.