"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 15:03 IST2025-10-27T15:02:17+5:302025-10-27T15:03:03+5:30
Congress Criticize Devendra Fadnavis: राहुल गांधी यांनी व्यक्त केलेल्या भावना योग्यच आहेत. हा राजकारणाचा विषय नसून महिला सुरक्षेचा विषय आहे, त्या अनुषंगाने राहुल गांधी यांचे ट्विट मार्गदर्शक म्हणून पहावे असे प्रतिपादन करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राहुल गांधींच्या ट्विटवर केलेली टीका राजधर्माला शोभा देत नाही, असं प्रत्युत्तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे.

"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप
मुंबई - लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी ज्या संवेदना व्यक्त केल्या आहेत, तेवढ्या सर्वांच्या मनात असल्या पाहिजेत. राहुल गांधी यांनी व्यक्त केलेल्या भावना योग्यच आहेत. हा राजकारणाचा विषय नसून महिला सुरक्षेचा विषय आहे, त्या अनुषंगाने राहुल गांधी यांचे ट्विट मार्गदर्शक म्हणून पहावे असे प्रतिपादन करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राहुल गांधींच्या ट्विटवर केलेली टीका राजधर्माला शोभा देत नाही, असं प्रत्युत्तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने केलेली आत्महत्या अत्यंत गंभीर व संवेदनशील आहे. राहुल गांधी यांनी त्याच अनुषंगाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. देवेंद्र फडणवीस हे कुचकामी गृहमंत्री ठरेल आहेत, त्यांच्या काळात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. तर दुसरीकडे फडणवीस यांच्या गृहमंत्रीपदाच्या काळात कोयता गँग, आका, खोक्या ही देणगी त्यांनी राज्याला दिली आहे. कायदा सुव्यवस्था वेशीवर टांगली गेली आहे त्यामुळे राज्याला किमान पूर्ण वेळ गृहमंत्री असणे गरजेचे आहे पण फडणवीस यांना गडचिरोलीतील खाणीत जास्त रस असून पंतप्रधानपदावर नजर असल्याने कायदा सुव्यवस्था, विकास व महिला सुरक्षा याच्याशी त्यांचा काहीही संबंध राहिलेला नाही.
भाजपा ही वॉशिंग मशीन आहे. अजित पवार, छगन भुजबळ यांच्यासह अनेकांवर भाजपाने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते पण त्यांनाच पक्षात व सत्तेत सहभागी करून पवित्र करुन टाकले आहे. फलटणच्या घटनेत माजी खासदाराचा उल्लेख होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना क्लिन चिट देणे म्हणजे त्यांचा या कटात सहभाग असल्याचा पुरावाच असल्याचेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
दरम्यान, जैन बोर्डींगची जमीन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ गिळंकृत करु पहात होते पण हे प्रकरण चव्हाट्यावर आल्याने मुरलीधर मोहोळ यांना वाचवण्यासाठी तो व्यवहार रद्द करावा लागला आहे परंतु हा व्यवहार रद्द करून चालणार नाही तर या व्यवहारात जे लोक सहभागी होते त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. जमीन हडप करण्याच्या कटात कोण कोण होते याचा पर्दाफाश झाला पाहजे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.