‘चंद्रपूर’चा विक्रम; २७३९ मेगावॅट वीजनिर्मिती, ४२ वर्षांच्या इतिहासातील केंद्राची सर्वोच्च कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 08:18 IST2026-01-30T08:18:27+5:302026-01-30T08:18:57+5:30
Chandrapur Super Thermal Power Station: सातत्याने तांत्रिक अडचणी, यंत्रबिघाड आणि प्रदूषणाच्या समस्यांमुळे अडचणीत आलेल्या चंद्रपूर औष्णिक वीज केंद्राने सर्व संकटांवर मात करत ऐतिहासिक विक्रम नोंदविला आहे. २९२० मेगावॅट उत्पादन क्षमतेच्या या वीज केंद्रातून १९ जानेवारी २०२६ रोजी २७३९ मेगावॅट वीजनिर्मिती करण्यात आली

‘चंद्रपूर’चा विक्रम; २७३९ मेगावॅट वीजनिर्मिती, ४२ वर्षांच्या इतिहासातील केंद्राची सर्वोच्च कामगिरी
चंद्रपूर - सातत्याने तांत्रिक अडचणी, यंत्रबिघाड आणि प्रदूषणाच्या समस्यांमुळे अडचणीत आलेल्या चंद्रपूर औष्णिक वीज केंद्राने सर्व संकटांवर मात करत ऐतिहासिक विक्रम नोंदविला आहे. २९२० मेगावॅट उत्पादन क्षमतेच्या या वीज केंद्रातून १९ जानेवारी २०२६ रोजी २७३९ मेगावॅट वीजनिर्मिती करण्यात आली असून, एकूण क्षमतेच्या ९३.८० टक्के उत्पादन साध्य करण्यात आले आहे. वीज केंद्राच्या ४२ वर्षांच्या इतिहासातील ही सर्वोच्च कामगिरी आहे. ३० वर्षे जुने संच क्रमांक ३ व ४ हे प्रत्येकी २१० मेगावॅट क्षमतेचे आहेत.
वीज केंद्राची स्थिती अतिशय नाजूक होती. सर्व अडचणींवर मात करण्यात यश आले. १९ जानेवारी रोजी २७३९ मेगावॅट म्हणजेच ९३.८० टक्के वीजनिर्मिती करण्यात यश आले. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.
- विजय राठोड, मुख्य अभियंता, चंद्रपूर महाऔष्णिक वीजनिर्मिती केंद्र, चंद्रपूर
प्रतिकूल परिस्थितीमध्येही विक्रम
संच क्रमांक ५ ते ९ हे प्रत्येकी ५०० मेगावॅट क्षमतेचे आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत या संचांमध्ये वारंवार बिघाड होत होता. विशेषतः संच क्रमांक ८ मधील ईएसपी प्रणाली व राख वाहून नेणाऱ्या यंत्रणांमुळे वीज उत्पादनावर गंभीर परिणाम झाला होता. तरीही वीजनिर्मितीचा विक्रम झाला आहे.
विजय राठोड यांनी मुख्य अभियंता म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर जनरेटर जळणे, ॲशबंडमधील समस्या, कोळसा हाताळणी विभागातील कन्व्हेअर बेल्ट तुटणे अशा अनेक अडचणी निर्माण झाल्या. मात्र, ऊर्जा मंत्रालय व प्रकाशगड येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय साधून सुमारे ८–९ महिन्यांत या सर्व अडचणींवर मात करण्यात आली.
आजवर कधीही उत्पादन क्षमतेच्या जवळ न पोहोचलेल्या चंद्रपूर वीज केंद्राने यावेळी २७३९ मेगावॅट वीज निर्मिती करून नवा विक्रम प्रस्थापित केला असून, राज्याच्या वीजपुरवठा व्यवस्थेसाठी ही कामगिरी महत्त्वाची मानली जात आहे.