उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 20:54 IST2025-06-08T20:54:02+5:302025-06-08T20:54:29+5:30
Chandrahar Patil news: लोकसभेला काँग्रेसमधून बंडखोरी करून विशाल पाटील यांनी चंद्रहार पाटलांना धुळ चारली होती. ठाकरेंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.

उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम
यंदाची सांगली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक भलतीच गाजली होती. महाविकास आघाडीत सांगलीवर काँग्रेस दावा सांगत होती, तर उद्धव ठाकरेंचीशिवसेना तुम्हाला कोल्हापूर सोडली असे सांगत सांगली मागत होती. अशातच उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची नाराजी ओढवून घेत परस्पर आपला उमेदवार जाहीर करून टाकला होता. ज्या उमेदवारासाठी ठाकरे सेनेने एवढा आडमुठेपणा केलेला तोच उमेदवार आता ठाकरे शिवसेना सोडून शिंदे शिवसेनेत चालला आहे. पैलवान चंद्रहार पाटलांनी आज याची घोषणा केली आहे.
लोकसभेला काँग्रेसमधून बंडखोरी करून विशाल पाटील यांनी चंद्रहार पाटलांना धुळ चारली होती. ठाकरेंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. परंतू, संपूर्ण काँग्रेस विशाल पाटलांच्या बाजुने गेली आणि चंद्रहार पाटलांच्या पराभवाचा निकाल लागला होता. तेव्हापासून चंद्रहार पाटील राजकारणापासून बाजुलाच होते. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोकण दौऱ्यावेळी चंद्रहार पाटील यांची शिंदेसेनेतील नेत्यांसह उपस्थिती दिसली होती. यावरून चंद्रहार पाटील आता शिवसेना शिंदे गटात जाणार असे दावे राजकीय वर्तुळात होऊ लागले होते, ते आता खरे ठरले आहेत.
२०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला प्रचंड मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले. यानंतर ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसले. संपूर्ण राज्यातून नेते, पदाधिकारी, हजारो कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करून शिवसेना शिंदे गटात गेले. ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात जाण्याचा सिलसिला अद्यापही सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे.
राज्यातील क्रीडा क्षेत्रामध्ये काम करत असताना, बऱ्याच त्रुटी, अडचणी, गैरप्रकार मी अनुभवलेले आहेत. अशा बाबींविरुद्ध मी वेळोवेळी आवाज देखील उठवला आहे. परंतु प्रत्यक्ष शासन सहभागाशिवाय असे प्रश्न मार्गी लागणे कठीण आहे. म्हणून क्रीडा क्षेत्रामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी व सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करण्यासाठी, मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी सरकार सोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे, असे आज चंद्रहार पाटलांनी जाहीर केले आहे. सोशल मीडियावर त्यांनी ही पोस्ट केली आहे.